जिल्ह्यात लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST2021-05-14T04:30:01+5:302021-05-14T04:30:01+5:30

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. नंतरच्या टप्प्यात कोरोना नियंत्रणासाठी काम करणारे कर्मचारी (फ्रंटलाईन वर्कर) आणि ज्येष्ठ ...

Two lakh vaccination stage crossed in the district | जिल्ह्यात लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पार

जिल्ह्यात लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पार

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. नंतरच्या टप्प्यात कोरोना नियंत्रणासाठी काम करणारे कर्मचारी (फ्रंटलाईन वर्कर) आणि ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. जिल्ह्याने २२ एप्रिल रोजी लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पूर्ण केला. पालकमंत्री पाडवी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लस घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन केले.

नागरिकांच्या मनामध्ये लसीकरणाविषयी अनेक गैरसमज असल्याने प्रशासनाने जनजागृतीवर विशेष भर दिला आहे. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील लसीकरणासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. ग्रामीण भागातील जनजागृतीसह लाभार्थ्यांच्या नोंदणीचे कामदेखील शिक्षकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी लोककला, स्थानिक भाषा, बैठका, घरोघरी भेटी, आदी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात येत आहे.

नोंदणी झालेल्या गावांत लसीकरणासाठी फिरते पथक पाठवून शिबिरांच्या आयोजनाद्वारे लसीकरणाला गती देण्याचे यशस्वी ठरले आहेत. यासाठी प्रशासनाने प्रत्येक तालुक्यासाठी दोन आणि अक्कलकुवा व धडगावसाठी चार वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली. आरोग्य विभागाचे कर्मचारी लसीकरणासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. ग्रामस्तरावरील मुख्याध्यापक, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आदींचा सहभागही महत्त्वाचा ठरला.

खासगी शाळांच्या सहकार्याने नागरिकांना शिबिरस्थळी आणण्यासाठी स्कूल बसचा उपयोग सुरू करण्यात आला. काही गावांत ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. याचा एकत्रित परिणाम म्हणून मागील केवळ २१ दिवसांत आणखी एक लाख लसींचे डोस देण्यात येऊन दोन लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे.

जिल्ह्यात १३ हजार ६६५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला, तर सात हजार ७२० कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. १० हजार ५३६ फ्रंटलाईन वर्कर्सनी पहिला, तर ८८४३ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वयोगटातील १४ हजारपेक्षा अधिक व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे, तर ४५ वर्षांवरील एक लाख १० हजार ७८६ व्यक्तींनी पहिला, तर २४ हजार २३४ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.

एकूण उद्दिष्टाच्या ११.२ टक्के लाभार्थ्यांनी पहिला, तर २.८० टक्के लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. आज, शुक्रवारपासून दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील लसीकरण मोहिमेलादेखील अधिक गती देण्यात येणार आहे.

आतापर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांना कुठलाही गंभीर त्रास झालेला नाही. लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

Web Title: Two lakh vaccination stage crossed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.