परजिल्ह्यातील १२ टक्के रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST2021-04-24T04:30:50+5:302021-04-24T04:30:50+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात ऑक्सिजनची सुविधा, उपलब्ध होणारे बेड आणि इतर सुविधा लक्षात घेता परजिल्ह्यातील तसेच गुजरात व मध्य प्रदेशातील ...

परजिल्ह्यातील १२ टक्के रुग्णांवर उपचार
नंदुरबार : जिल्ह्यात ऑक्सिजनची सुविधा, उपलब्ध होणारे बेड आणि इतर सुविधा लक्षात घेता परजिल्ह्यातील तसेच गुजरात व मध्य प्रदेशातील अनेक गावांमधील कोरोना रुग्णांची नंदुरबारकडे धाव वाढली आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण पडण्याची शक्यता आहे. १५ दिवसांत २४३ रुग्णांनी येथे उपचार घेतला आहे. अद्यापही ६२ जण दाखल आहेत, तर या काळात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत १२ टक्के रुग्ण येथे उपचार घेत आहेत.
गेल्या महिन्यात जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढल्याने बेड मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण सुरत, नाशिक, धुळे येथे उपचारासाठी जात होते. त्यामुळे वेळ आणि पैसादेखील खर्च होत होता. ही बाब लक्षात घेता आणि जनतेची ओरड पाहता जिल्ह्यातच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार लागलीच कोविड रुग्णालये वाढविण्यात आली. खासगी रुग्णालयांना उपचारासाठी परवानगी देण्यात आली. बेडची संख्या वाढविण्यात आली. ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी दोन ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आले. विलगीकरण कक्षांची संख्या वाढली.
गावोगावी अलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातच कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची सोय झाली. त्यामुळे सुरत, नाशिक येथे जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची कमी झाली आहे. याउलट नंदुरबारात बाहेरगावचे रुग्ण दाखल होऊ लागले आहेत. कोरोना रुग्णांसह इतर आजारांचे रुग्णदेखील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
गुजरात व मध्य प्रदेशातीलही जिल्हा रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये गुजरातमधील तापी, नर्मदा तसेच मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील अनेक गावांमधील रुग्ण दाखल होण्यास येत आहेत. विशेषत: जिल्ह्याच्या सीमेवरील गावांमधील रुग्णांचा त्यात मोठ्या प्रमाणावर भरणा आहे. गेल्या तीन दिवसांत हे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. कारण गुजरात व मध्य प्रदेशातदेखील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्या भागातील शहरांमधील रुग्णालयांमध्ये बेड मिळत नसल्याने अशा रुग्णांनी नंदुरबारकडे धाव घेतली आहे.
धुळे, नाशिक व जळगाव जिल्हा
परराज्यासह धुळे, नाशिक व जळगाव जिल्ह्यातील रुग्णांचीदेखील धाव नंदुरबारकडे वाढली आहे. जिल्हा रुग्णालयातील सुविधा आणि शहादा व नंदुरबारातील काही मोठ्या कोरोना रुग्णालयांतील सुविधा लक्षात घेता रुग्ण इकडे येत आहेत. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात अर्थात गेल्या वर्षीदेखील धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रुग्ण नंदुरबारात दाखल होत होते. अनेक रुग्ण बरे होऊन परतलेदेखील.
बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्के
परजिल्ह्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण तब्बल ७२ टक्के आहे. १५ दिवसांत दाखल २३१ रुग्णांपैकी १६८ रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण पाहता परजिल्ह्यातील रुग्ण नंदुरबारकडे धाव घेऊ लागले आहेत.
ऑक्सिजन सहज उपलब्ध
इतर जिल्ह्यांत रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाही, ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. नाशिक व सुरत येथे तर ऑक्सिजन बेडच उपलब्ध नाहीत. त्या मानाने नंदुरबार जिल्ह्यात ऑक्सिजनची फारशी कमतरता नाही. दोन ऑक्सिजन प्लांट आधीच सुरू आहेत. लवकरच तिसरा प्लांट सुरू होत आहे. शहादा व तळोदा येथेही मिनी प्लांट तयार होत असून तीन खासगी दवाखान्यांनी प्लांट बसविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ऑक्सिजनबाबत जिल्ह्यात तरी सध्या कुठलीही टंचाई नसल्यामुळे ऑक्सिजन बेडला नियमित व पुरेसा पुरवठा होत असल्याचे चित्र आहे.
स्वॅब देणाऱ्यांचेही प्रमाण वाढले
जिल्ह्यात आतापर्यंत परजिल्ह्यातील ३,७१६ जणांनी स्वॅब दिले आहेत, तर १५ दिवसांत ८४९ जणांनी स्वॅब दिले आहेत. येथील आरटीपीसीआर तपासणी केंद्रात दीड ते दोन दिवसांत स्वॅब अहवाल येत आहेत. याशिवाय रॅपिड चाचणीची जिल्ह्यात १५ पेक्षा अधिक केंद्रे आहेत. त्यामुळेदेखील स्वॅब देण्याचे प्रमाण परजिल्ह्यातील लोकांचे जास्त आहे.