कोरोनाबाधित व्यक्तीवर अलगीकरण कक्षातच उपचार करा - राधाकृष्ण गमे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST2021-04-16T04:30:42+5:302021-04-16T04:30:42+5:30
दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित नंदुरबार जिल्हा कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जि.प.चे मुख्य कार्यकारी ...

कोरोनाबाधित व्यक्तीवर अलगीकरण कक्षातच उपचार करा - राधाकृष्ण गमे
दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित नंदुरबार जिल्हा कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते.
गमे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्याने गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी केली. या वेळी ग्रामीण भागात रुग्णांची संख्या अधिक येत असल्याने विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित आढळलेल्या ३५५ गावांत प्रतिबंधित क्षेत्र बारकाईने राबविल्यास इतर गावांना संसर्गमुक्त ठेवता येईल. संसर्ग झालेला व्यक्ती शोधणे, त्याची चाचणी करणे आणि उपचार वेळेवर करण्याची गरज आहे. रुग्णालयात येण्यापूर्वी ऑक्सिजन पातळी खालावलेला रुग्ण आल्यास उपचार करण्यास मर्यादा येतात. जिल्ह्यात दुर्गम भाग असूनही चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत, पण गंभीर परिस्थितीत रुग्ण आल्याने उपचार योग्यरीतीने करणे शक्य होत नसल्याने वेळेवर लक्ष देणे आवश्यक आहे. ऑक्सिजन पातळी खालावल्यावर रुग्ण रुग्णालयात का पोहोचतात याचे विश्लेषण करावे व या शृंखलेतील त्रुटी दूर कराव्यात. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी २४ तासांत मृत्यू झालेल्यांची यादी रुग्णालयातून घ्यावी व सर्वेक्षण पथकाकडून या व्यक्तींची माहिती घ्यावी. रुग्णालयात उशिरा पोहोचण्याच्या कारणांचे विश्लेषण करण्यासोबत सर्वेक्षणातील अतिजोखमीच्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करावे. कोरोनाबाधित व्यक्तींना विलगीकरण कक्षात प्राधान्याने आणावे. गृह विलगीकरणात त्याच्या प्रकृतीकडे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे कुटुंबबाधित होत आहे आणि परिसरातील इतरांनाही संसर्ग होत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन बेड वाढविण्याचे नियोजन प्रशासन करीत आहे. रेमडेसिविर औषध वितरण शासनाच्या निर्देशानुसार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्णाच्या गरजेनुसार रुग्णालयाला औषधे देण्यात येत आहे. शासनातर्फेदेखील जिल्ह्याला विविध सुविधांसाठी सहकार्य करण्यात येत आहे. यासोबत संपर्क साखळी योग्यरीतीने शोधल्यास संसर्गावर नियंत्रण आणणे शक्य आहे. त्यासाठी कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या गावातील कर्मचाऱ्यांनी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर द्यावा. शाळा, आश्रमशाळा, सभागृह आदी ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करावे. या ठिकाणी स्वच्छतेची व्यवस्था करावी. कुटुंबीयांचा बाधित व्यक्तीशी संपर्क येऊ देऊ नये. झोकून देऊन काम केल्यास बाधित व्यक्तीचे मृत्यू रोखण्यास यश येईल. कोरोनाला जिल्ह्यातून घालविण्यासाठी सर्वांनी योद्ध्याप्रमाणे काम करावे. प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने आपली भूमिका योग्यप्रमाणे बजावल्यास संसर्गवाढीचा दर कमी करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लसीकरणाचा वेग वाढवा
लसीकरणामुळे संसर्ग झाल्यानंतरचे गंभीर परिणाम टाळता येतात. लसीकरण झालेल्या व्यक्तीमध्ये परिणाम कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उर्वरित कोरोना योद्धे आणि ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. लसीकरणामुळे काहीच त्रास होत नाही हे नागरिकांना समजावून सांगावे. नागरिकांना लसीकरणाबाबत माहिती देण्यासाठी गावातील लहान डॉक्टर, स्थानिक लोकप्रतिनिधी, पाड्यातील प्रभावी व्यक्ती यांचे सहकार्य घेण्यात यावे. ४५ वर्षांवरील नागरिकांच्या याद्या तयार करून लसीकरणासाठी पाठपुरावा करावा. सूक्ष्म दैनंदिन नियोजन तयार करून त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करून घ्यावे.