एसटीचे ‘सीमोल्लंघन’; प्रवासी मात्र घरातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST2021-07-09T04:20:33+5:302021-07-09T04:20:33+5:30
नंदुरबार : कोरोनामुळे एसटीचे वैभव हरपले आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसचे वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न ...

एसटीचे ‘सीमोल्लंघन’; प्रवासी मात्र घरातच!
नंदुरबार : कोरोनामुळे एसटीचे वैभव हरपले आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसचे वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न करत आहे. परंतु या प्रयत्नांना सध्यातरी नुकसानीचा सुरुंग लागला असून प्रवासी संख्या कमी झाल्याने वाढत्या डिझेलच्या दरात एसटीचा तोटा अधिक वाढत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एकूण चार आगारांतून २८९ बस चालवल्या जातात. २०२० मध्ये कोरोनापूर्वी दिवसभरात चार आगारांतून राज्यासह परराज्याच्या सीमा ओलांडून धावणाऱ्या बस दिवसाला साधारण ३६ लाख रुपयांचे उत्पन्न आणत होत्या. परंतु गत दीड वर्षात कोरोनामुळे चारही आगारांची वाताहत झाली असून सध्या केवळ चार आगारांतून ६०० फेऱ्या होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, परराज्यातील बस सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले नसल्याने जिल्ह्यातील चारही आगारांच्या बस सध्या केवळ महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांतून धावत असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या काळात गुजरात आणि मध्यप्रदेश राज्याकडे धावणाऱ्या बस सुरू झाल्यास एसटीचे नुकसान भरून निघण्यास मदत होणार असल्याचा विश्वास अधिकारी वर्तवत आहेत.
ग्रामीण भागातील बस अद्यापही बंदच
नंदुरबार, शहादा, नवापूर आणि अक्कलकुवा या आगारातून जिल्ह्यातील विविध भागांत बस सोडल्या जातात. यातून ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळतो. परंतु तीन महिन्यांपासून ग्रामीण भागातील १०० टक्के बस बंद आहेत.
नंदुरबार आगारातून पश्चिम पट्टा व पूर्व पट्ट्यात सर्वाधिक बस सोडल्या जात होत्या. या बस तीन महिन्यांपासून बंद आहेत.
जिल्ह्यातील चारही आगारांची सर्वाधिक कमाई ही शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी वाहतुकीतून होत होती. शाळा बंद असल्याने ही कमाईही बंद आहे.
नाशिक व धुळे मार्गावर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी
सध्या चारही आगारातून सुरू असलेल्या बसमध्ये नाशिक आणि धुळे याच मार्गावरच्या बसमध्ये प्रवासी दिसून येत आहेत.
नंदुरबार येथून नाशिक व धुळेसाठी दिवसाला २० तर शहादा आगारातूनही १५ च्या जवळपास फेऱ्या करण्यात येत आहेत.
शहादा आगारातून शिरपूरसाठी चालवण्यात येणाऱ्या बसमध्ये प्रवासी दिसून येतात.
तोटा वाढला
जिल्ह्याच्या चारही आगारातून दर दिवशी धावणाऱ्या बस साधारण ३५ लाख रुपये २०१९ पर्यंत कमावले जात होते. परंतु यात आतातरी घट आली आहे. सध्या जिल्ह्यातील चारही आगारातून बस साधारण २० लाख प्रवास भाडे कमावत आहेत. नंदुरबार आठ, शहादा ६ तर नवापूर व अक्कलकुवा आगार प्रत्येकी तीन लाख कमाई करते.
दुसऱ्या राज्याच्या बस अद्यापही बंदच
लगतच्या गुजरात आणि मध्यप्रदेश राज्याकडे जाणाऱ्या बस अद्यापतरी बंद आहेत. नंदुरबार आगारातून सुरतसाठी दिवसभरात ३६ पेक्षा अधिक फेऱ्या होत होत्या. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. इतर तीनही आगारातून गुजरातच्या बस बंद करण्यात आल्या आहेत.