म्हसावद-सुलतानपूर रस्त्यावर वाहतूक ठरतेय धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST2021-02-13T04:30:45+5:302021-02-13T04:30:45+5:30
हा रस्ता मध्य प्रदेश राज्याकडे जाण्यासाठी एकमेव असल्याने परिसरातील नागरिकांसाठी सोयीचा आहे. या रस्त्याचे रूंदीकरण होणार असले तरी एक-दीड ...

म्हसावद-सुलतानपूर रस्त्यावर वाहतूक ठरतेय धोकेदायक
हा रस्ता मध्य प्रदेश राज्याकडे जाण्यासाठी एकमेव असल्याने परिसरातील नागरिकांसाठी सोयीचा आहे. या रस्त्याचे रूंदीकरण होणार असले तरी एक-दीड वर्षापासून घोडे अडले कोठे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. किशोर पाटील यांनी या रस्त्याच्या दुर्दशेबाबत खासदार डॉ.हिना गावित, आमदार राजेश पाडवी, जि. प. सदस्य यांच्याकडे अनेकवेळा तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. हा रस्ता चार किलोमीटरचा असला तरी पार करण्यासाठी अर्धा तासाचा कालावधी लागतो इतकी दुर्दशा झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे झाल्याने ऊस, केळी, पपईची वाहतूक करणारी वाहने नेताना वाहन चालकाला जीव धोक्यात टाकून जावे लागते. दर १५ दिवसांत एक वाहन उलटून अपघात होऊन वाहनमालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. डांबरीकरण नावालाच उरले असून, पूर्णतः खडी उखडून गेली आहे. रस्त्यावरील भराव अनेक ठिकाणी खचल्याने उंचवटे तयार झाले आहेत. चारही फरशींवरील भराव खचला आहे. वळणावरील रस्त्यांच्या बाजूची झाडे वाढली आहेत. परिणामी समोरून येणारे वाहन दिसत नाही. हा रस्ता टवळाई, गणोर, अंबापूर, आडगाव व म्हसावद परिसरातील गावांना सोयीचा असून, वर्दळीचा रस्ता असल्याने रस्त्याची दुरुस्ती, रुंदीकरण त्वरित करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. किशोर पाटील यांच्यासह सुलवाडा, सुलतानपूरचे सरपंच, उपसरपंच व नागरिकांनी केली असून, दुरुस्ती न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.