रस्त्याच्या बंद कामामुळे वाहतुकीला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST2021-07-08T04:20:53+5:302021-07-08T04:20:53+5:30
प्रकाशा : प्रकाशा ते तोरणमाळ या रस्त्याचे काम गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरू आहे. प्रकाशा बसस्थानक परिसर ते वैजाली ...

रस्त्याच्या बंद कामामुळे वाहतुकीला अडथळा
प्रकाशा : प्रकाशा ते तोरणमाळ या रस्त्याचे काम गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरू आहे. प्रकाशा बसस्थानक परिसर ते वैजाली चौफुलीपर्यंतच्या रस्त्याच्या एका साईडवर डांबरीकरण झाले आहे; तर दुसऱ्या बाजूचे काम अर्धवट सोडण्यात आल्याचे दिसून येत आहे. डांबरीकरणाचे काम अर्धवट सोडून जवळपास महिना झाला असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच या परिसरातील दुकानदारांनाही या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत असे की, प्रकाशा ते तोरणमाळ या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या दीड-दोन वर्षापासून सुरू आहे. रस्त्यालगत गाव परिसरातील गटारींचे बांधकाम करण्यात आले आहे. ज्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे, त्या संबंधित कंपनीने काम बंद केल्याचे कळते. त्यामुळे या अपूर्ण कामामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. या रस्त्यालगत दुतर्फा दुकाने असून, रस्त्याच्या अर्धवट कामामुळे दुकानावर ये-जा करण्यासाठीदेखील ग्राहकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
या अर्धवट कामामुळे ज्येष्ठ व अपंग नागरिकांना दुखापत होऊन अपघातदेखील घडत आहेत. असे प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी वरिष्ठांनी दखल घेत काम सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
केदारेश्वर मंदिर ते प्रकाशा बसस्थानकापर्यंतचा मार्गावर डांबरीकरण झाले आहे. मात्र यादरम्यान गटारीचे काम अपूर्ण असून, प्रकाशा बसस्थानक ते वैजाली चौफुलीपर्यंतच्या ३०० ते ४०० मीटर लांबीचा आणि १० मीटर रुंदीचा रस्ता आहे. त्यापैकी पाच मीटर रुंदीच्या रस्त्याचे डांबरीकरण झाले असून, पाच मीटरचे डांबरीकरण अद्याप झालेले नाही. त्यामुळे वाहतुकीला अडचण येत आहे. या अर्धवट कामामुळे बऱ्याचवेळेला वाहतुकीचा खोळंबादेखील होतो. तसेच बसस्थानक ते वैजाली चौफुलीदरम्यान गटारीचे काम ठीक ठिकाणी रखडले आहे. बांधकाम साहित्य तथा रॉ-मटेरियल रस्त्याचा आजू-बाजूला टाकल्याने ग्रामस्थांना त्यास सामोरे जावे लागत आहे. तेव्हा हे काम का बंद आहे, याची शहानिशा होणे गरजेचे आहे.
अपूर्ण कामामुळे वाहतुकीला अडथळा येत असल्याने वरिष्ठांनी याची दखल घेत काम का बंद आहे, याचा तपास करून हे काम पूर्ववत सुरू करून लवकरात लवकर डांबरीकरण पूर्ण करीत हा रस्ता वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रकाशापासून म्हसावदमार्गे तोरणमाळ या रस्त्याच्या कामाला गती मिळाली आहे. त्यापैकी प्रकाशा-काथरदामार्गे म्हसावद रस्त्याचे काम पूर्णत्वास येत आहे.
रॉ-मटेरियल गेले कुठे
याआधीचा डांबरी रस्ता खोदल्यानंतर निघालेले रॉ-मटेरियल गेले कुठे? असा सवाल ग्रामस्थ करत आहे. आधीचा रस्ता खोदल्यानंतर जे रॉ-मटेरियल काढण्यात आले, ते कुठे ठेवले आहे, याची विचारणा आता सूज्ञ लोकांकडून केली जात आहे.
संबंधित ठेकेदाराने हे रॉ-मटेरियल कुठे वापरले, अशी विचारणा आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. शिवाय रस्त्याच्या आजूबाजूला जे लोखंडी पोल होते ते काढल्याचे समजते. तेव्हा या सर्व वस्तू कुठे ठेवल्या आहेत, याची माहिती. वरिष्ठांना आहे का?, असे सूज्ञ लोक विचारत आहे.