लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याची व्यापाऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST2021-04-01T04:31:17+5:302021-04-01T04:31:17+5:30
निवेदनात म्हटले आहे की, आजपर्यंत जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. २६ ...

लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याची व्यापाऱ्यांची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, आजपर्यंत जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. २६ मार्चच्या आदेशात १ ते १५ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व आस्थापना (दुकाने) बंद ठेवण्याचा निर्णय केला आहे . मे, जून २०२० पासून लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता देण्यात आली. व्यापार, व्यवसाय, उद्योग पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. परंतु अनेक भागात काही निर्बंध लागू होतेच. त्यामुळे अनेक व्यवसाय अडचणीत आहेत. जसे हॉटेल, केटरींग, मंडप, मॅरेज लॉन/हॉल, कापड, भांडी, बांधकाम, सोने-चांदी, इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी लहान-मोठे व्यवसाय आजही अडचणीत आहेत. व्यवसायासाठी केलेली गुंतवणूक, त्यासाठी घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज, जागेचे भाडे, कर्मचारी वर्गाचे पगार, अनेक व्यवसायात परप्रांतीय कामगार कामावर आहेत. त्यांचा मोठा प्रश्न लॉकडाऊन काळात उभा राहतो. अशा अनेक प्रकारच्या दुकानाचे, व्यवसायाचे अनेक लहान-मोठ्या अडचणींमुळे संपूर्ण व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. आता परत १५ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर झाला आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक व लहान-मोठे हातगाडीवरील व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. कोरोना या साथीच्या रोगास प्रतिबंध करण्यास आम्हीही बांधील आहोत. परंतु यासाठी आता लॉकडाऊन हा पर्याय नाही. यासाठी आपण २६ मार्चला दिलेल्या आदेशात बदल करुन सर्व प्रकारच्या आस्थापना या सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात व आठवड्यातून एकदा जनता कर्फ्यू जाहीर करावा. तसेच हॉटेल व खानावळी यांनाही वेळ रात्री नऊ वाजेपर्यंत वाढवून मिळावी व रात्रीची संचारबंदी कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करीत असल्याचे नमूद केले आहे. आम्ही आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ग्राहकांना मास्क लावणे बंधनकारक करू तसेच सॅनिटायझरची व्यवस्था व सोशल डिस्टन्सिंग आदी व आपण दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करु. आमच्या प्रस्तावावर सहानुभूतीपूर्वक विचार करावा व व्यापार वाचवावा, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल शर्मा, कल्पेश पटेल, मनोज जैन, रमाशंकर माळी, रमेश जैन, गौरव जैन आदींसह व्यापारी बांधवांच्या सह्या आहेत.