वर्षभरात कोरोनामुळे जिल्ह्यातील ३३ शिक्षकांनी गमावला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST2021-05-03T04:24:45+5:302021-05-03T04:24:45+5:30
नंदुरबार : जिल्ह्यातील ३३ प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गेल्या वर्षभरात कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सद्य:स्थितीत शाळांना ...

वर्षभरात कोरोनामुळे जिल्ह्यातील ३३ शिक्षकांनी गमावला जीव
नंदुरबार : जिल्ह्यातील ३३ प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गेल्या वर्षभरात कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सद्य:स्थितीत शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या असल्या तरी कोरोना नियंत्रणासाठी अद्यापही शिक्षकांना विविध ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. तर परजिल्ह्यातील शिक्षक सुट्टीच्या कालावधीत गावी जाण्यासाठी धडपड करीत असून, त्यांना कोरोनाच्या ड्यूटीतून कार्यमुक्त करणे सध्या तरी शक्य नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी फ्रंटलाइन वर्कर्सप्रमाणे विविध विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून विविध ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. त्यात शिक्षण विभागातून माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचादेखील समावेश आहे. आजच्या परिस्थितीत चार हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. येत्या काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या शिक्षकांना सर्वाधिक टार्गेट हे लसीकरणाचे देण्यात आले आहे. त्यासाठी शिक्षक आपल्या शाळेच्या गावात विविध क्लृप्त्या वापरून लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करीत आहेत.
शाळाबंद, कोरोना ड्यूटी सुरू
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच जिल्ह्यातील शाळा लागलीच बंद करण्यात आल्या. ऑनलाइन शिक्षण सुरू असताना शिक्षकांच्या सेवा कोरोनाच्या नियंत्रणासाठी अधिग्रहित करण्यात आल्या. माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या आदेशान्वये शिक्षकांना कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त्या देण्यात आल्या. काही शिक्षकांना आळीपाळीने, तर काहींना सरसकट ड्यूटी देण्यात आली आहे. आता लसीकरण नोंदणीसाठी सर्वांना सक्तीचे करण्यात आले आहे.
उन्हाळी सुट्ट्या सुरू
राज्याच्या शिक्षण विभागाने प्राथमिक व माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. नेहमीप्रमाणे जूनमध्ये शाळा सुरू होणार आहेत. यादरम्यान, १२वीच्या परीक्षादेखील होण्याची शक्यता आहे. त्यातच कोरोना नियंत्रणासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या कायम आहेत. अशावेळी जिल्हाबाहेरील शिक्षकांना आपल्या गावी जाणे शक्य नसल्याचे चित्र आहे. शिवाय काही शाळांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन व निकाल तयार करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत. त्यामुळे तोदेखील एक ताण शिक्षकांवर कायम राहणार आहे.