तीन वर्षानंतर रेल्वे बोगद्याच्या कामस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:11 IST2020-02-11T13:11:14+5:302020-02-11T13:11:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर सोडविण्यास मदत करणारा नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम अखेर ...

तीन वर्षानंतर रेल्वे बोगद्याच्या कामस सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर सोडविण्यास मदत करणारा नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम अखेर तीन वर्षानंतर सुरू झाले आहे. ठेका देण्यात आलेल्या कंपीनीने तीन वर्षांपूर्वीच रेडीमेड बोगदा तयार करून ठेवला असतांना रेल्वे परवाणगी देत नसल्यामुळे तो संबधीत जागेवर बसविला गेला नव्हता. आता या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शहरातून गेलेल्या रेल्वे मार्गामुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. पूर्वी रेल्वे गेटमुळे वाहतुकीचा ताण होता. परंतु १२ वर्षांपूर्वी उड्डाणपुल बांधण्यात आल्यानंतर थोडीफार समस्या सुटली आहे. उड्डाणपुलासह नळवा रस्त्यावर बोगद्याच्या खालून देखील वाहतूक केली जाते. परंतु एकच बोगदा असल्यामुळे एकाचवेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत. शिवाय चारचाकी वाहनांना देखील मर्यादा असतात. त्यामुळे या रस्त्यावर दुसरा बोगदा असावा यासाठीची मागणी करण्यात येत होती. सहा वर्षांपूर्वी त्याला मंजुरीही मिळाली, परंतु निधी वर्ग होत नव्हता.
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आघाडी शासन काळात त्यासाठी निधी मंजुर करून घेतला होता. चार वर्षांपूर्वी बोगदा कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार नाशिक येथील एका कंपनीला हे काम मिळाले. कंपनीने सर्व्हे करून कामाला सुरुवात केली व रेडीमेड बोगदा तयार झाला. गेल्या तीन वर्षांपासून हा बोगदा तयार होऊन धुळखात पडला होता. त्याच्या आजूबाजू मोठ्या प्रमाणावर गवत व झाडे उगली होती. हा बोगदा रेल्वे रुळाखाली बसविण्यासाठी मात्र रेल्वे विभागाकडून त्या कामाला मंजुरी दिली जात नव्हती. अखेर गेल्या महिन्यात रेल्वेने परवाणगी दिली आहे. त्यानुसार आता कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
पुढच्या आठवड्यात तयार झालेले दोन्ही बोगदे हे ठरलेल्या जागेत बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी रेल्वेचा ब्लॉक घेणे गरजेचे नसल्याचे संबधितांनी सांगितले. यासाठी सुरुवातीला रेल्वे रुळाखालील भरावातून गेलेले केबल, ड्रेनेज लाईन, पाईप लाईन आदी हलविले जात आहे. या कामाला आठ दिवस लागण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या असलेल्या बोगद्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाण पाणी वाहत आहे. यामुळे रहदारी वारंवार विस्कळीत होत आहे.
या ठिकाणी कच्चे व पक्के अतिक्रमण देखील झाले आहे. ते काढणे देखील गरजेचे ठरणार आहे. त्यासाठी संबधितांना सुचना देण्यात आली. लवकरच हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. त्यानंतर हा रस्ता विस्तृत करून पालिकेतर्फे डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.
नवीन बोगदा झाल्यास दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना ते सोयीचे ठरणार आहे. आधीच बोगदा ते थेट नळवा हद्दीपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येवून मध्ये दुभाजक व पथदिवे लावण्यात आले आहेत. दुसरा बोगदाही झाल्यास या रस्त्याच्या सौंदर्यकरणात वाढच होणार आहे.
या बोगद्यासाठी व कामासाठी काहींनी विरोध केला होता. त्यासाठी रेल्वेकडे तक्रारी देखील करण्यात आल्याचे समजते. परंतु सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे कामाला लवकरच गती मिळेल अशी अपेक्षा असतांना तब्बल तीन वर्षाचा कालावधी लोटला.
या बोगद्यामुळे उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. याशिवाय पावसाळ्यात बोगद्याखाली साचणारे पाणी आता साचणार नाही. शिवाय दोन्ही बाजूंनी येण्याजाण्यासाठी सोय असल्याने वाहतूक सुटसूटीत होणार आहे.