तीन विद्यार्थी बाधीत मात्र प्रशासन अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 13:18 IST2020-05-10T13:18:28+5:302020-05-10T13:18:35+5:30
नंदुरबार : अक्कलकुवाहून बिहारला गेलेले तीन विद्यार्थी कोरोनाबाधीत असल्याचे अहवाल सहरसा (बिहार) येथील प्रशासनाला प्राप्त झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या ...

तीन विद्यार्थी बाधीत मात्र प्रशासन अनभिज्ञ
नंदुरबार : अक्कलकुवाहून बिहारला गेलेले तीन विद्यार्थी कोरोनाबाधीत असल्याचे अहवाल सहरसा (बिहार) येथील प्रशासनाला प्राप्त झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या येथील आरोग्य तपासणीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. चार दिवसांपूर्वी विशेष रेल्वेने अक्कलकुवा येथील अनेक विद्यार्थी तसेच उत्तर भारतीय नागरिकांना नंदुरबारहून रवाना करण्यात आले होते. त्यापूर्वी या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाल्याचे सांगितले गेले होते. तरीही बिहारमध्ये जाताच या विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह कसा आला याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाला याबाबत मात्र माहिती नसल्याचे सांगण्यात आले.
’रेल्वेने गेलेल्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी रेल्वे स्थानकात लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
’या तीन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली याचाही शोध घेणे आवश्यक आहे.
’विद्यार्थी सहरसाला पोहचल्यावर तेथील प्रशासनाने सर्वांची आरोग्य तपासणी करून काहींचे स्वॅब घेतले. त्यात हे तीन विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले आहेत.
नंदुरबारहून गेलेले विद्यार्थी बिहारमध्ये कोरोना पॉझिटिव्ह निघत असतील ती बाब गंभीर मानावी लागणार आहे. याचा अर्थ या विद्यार्थ्यांची जिल्ह्यात कशा पद्धतीचे आरोग्य तपासणी झाली असेल हा प्रश्न उपस्थित होत आहे.
नंदुरबार ते सहरसा हा दोन दिवसांचा प्रवास होता. या प्रवासात विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगसाठी सुचना देण्यात आल्या होत्या. तशी बैठक व्यवस्था देखील होती.
सहरसाचे जिल्हाधिकारी कौशल कुमार यांनी १३ वर्षीय दोन तर १८ वर्षीय एक विद्यार्थी असल्याचे सांगितले आहे. या विद्यार्थ्यांच्या सोबत इतर विद्यार्थ्यांचेही स्वॅब घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.