म्हसावद येथे तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST2021-03-24T04:28:53+5:302021-03-24T04:28:53+5:30
गेल्या ३ दिवसात म्हसावद गावातील नऊ व्यक्तींचा मृत्यू झाला असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यामुळे गावातील मृत्यू कोरोनामुळे होत ...

म्हसावद येथे तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू
गेल्या ३ दिवसात म्हसावद गावातील नऊ व्यक्तींचा मृत्यू झाला असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यामुळे गावातील मृत्यू कोरोनामुळे होत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. गावामध्ये कोणतेही निर्बंध नसल्याने ग्रामस्थ मोकाट फिरत असल्याने धोका निर्माण होत आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडासह गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनातर्फे आदेश देण्यात आला आहे. कोरोनासदृश परिस्थिती आटोक्यात यावी, यासाठी म्हसावद गावात बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे तीन दिवस स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. म्हसावद येथील सोमवारी भरणारा आठवडे बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे.
म्हसावद ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस प्रशासन यांची कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाबाबत बैठक घेण्यात आली. गावात जनता कर्फ्यू व आठवडे बाजार बंदचा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामविस्तार अधिकारी भटेसिंग गिरासे यांनी जाहीर केले. जनता कर्फ्यू कालावधीत विनामास्क आढळणाऱ्यावर तसेच सामाजिक अंतर न पाळता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून दंड देण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी सांगितले. याबाबत गावात दवंडीच्या माध्यमातून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यावेळी उपसरपंच चिंतामण धनगर, माजी उपसरपंच प्रकाश पाटील, अंबालाल पाटील, मदन पावरा, मुकुंद अहिरे, सिद्धार्थ सुरवाडे उपस्थित होते.