टंचाईग्रस्त पाड्यांची तहान भागणार तरी कधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST2021-03-28T04:29:21+5:302021-03-28T04:29:21+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात यंदा भूजल पातळी दीड मीटरने वर आली असल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट झाली आहे. यातून जिल्ह्यात ...

टंचाईग्रस्त पाड्यांची तहान भागणार तरी कधी
नंदुरबार : जिल्ह्यात यंदा भूजल पातळी दीड मीटरने वर आली असल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट झाली आहे. यातून जिल्ह्यात ९२ गावे आणि १८८ पाडे टंचाईग्रस्त असल्याने त्याठिकाणी उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले होते. जानेवारी ते मार्चपर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील या गाव पाड्यांवर टंचाई दिवसेंदिवस वाढत असतानाही उपाययोजनांना मात्र गती आलेली नाही.
सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यातील सर्वाधिक गाव आणि पाड्यांचा या टंचाई आराखड्यात समावेश करण्यात आल्याने टंचाई आराखड्यानुसार उपाययोजना करण्याचे नियोजन होते. परंतू मार्च संपूनही या सर्वच गावांमध्ये उपाययोजनांच सुरुच झालेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यात दोन पाड्यांवर यंदाही टँकर लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे टँकर सुरु होणार असले तरी याठिकाणी भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी भेट देवून पाहणी करणार होते. परंतू ही पाहणीही झालेली नसल्याने टँकर सुरु होण्यास खो मिळाला आहे. धडगाव तालुक्यातील रोषमाळ खुर्दसह १५ गावांमध्ये पाणीटंचाई असल्याने त्याठिकाणी पाणी पुरवठा विभागाचे भूवैज्ञानिक भेट देवून पाहणी करणार होते. परंतू अधिका-यांनी या गावांना भेटीच दिल्या नसल्याचा दावा स्थानिक ग्रामस्थांकडून केला जात आहे.
जिल्ह्यात एकूण ९५२ आवे आहेत. यंदा टंचाईग्रस्त म्हणून समोर आलेल्या ९२ गावे आणि १८८ पाड्यांसाठी २८८ विंधनविहिरी खोदल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ३७ ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. ३० बोअरवेल तर ४८ पाणी योजनांची दुरुस्ती प्रस्तावित आहे. परंतू यातील कोणत्याच कामाला गती नसल्याने टंचाईपासून सुटका होणार कशी असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून दरवर्षी विंधन विहिरींचे खोदकाम करण्याबाबत उद्दीष्ट्य घेतले जाते. परंतू प्रत्यक्षात विंधन विहिरींचे खोदकाम मात्र पावसाळ्यापर्यंत सुरु ठेवत हातपंप बसवण्यास टाळाटाळ केले जात असल्याचे प्रकार यापूर्वी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाच्या २८८ विधंनविहिरी ह्या मार्चपूर्वी पूर्ण होणार असे सांगण्यात आले असले तरी या विहिरी जूनपर्यंतही पूर्ण होणे शक्य नसल्याचे विभागाच्या कामाकाजावरुन दिसून येत आहे.