लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सर्वांसाठीच कसोटीचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 12:30 IST2020-05-05T12:30:33+5:302020-05-05T12:30:42+5:30
रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे ठप्प झालेले जनजीवन लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात हळूहळू सुरू झाले असून हा ...

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सर्वांसाठीच कसोटीचा!
रमाकांत पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे ठप्प झालेले जनजीवन लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात हळूहळू सुरू झाले असून हा काळ मात्र सर्वांसाठीच कसोटीचा ठरणार आहे. लोकांना सोशल डिस्टन्सिंगसह प्रशासनाचे नियम पाळत दैनंदिन कामे करण्याची सवय लावावी लागणार आहे. तर दुसरीकडे नियम न पाळणाºया बेशिस्तांना आवर घालण्यासह स्थलांतरित मजूर व बाहेरगावी अडकलेले नागरिक परतू लागल्याने निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती आणि त्यातच उन्हाच्या तीव्र तडाख्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करणे प्रशासनासाठी मोठी कसोटी ठरणार आहे.
कोरोनाचा पहिल्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नव्हता. पण दुसºया टप्प्याला सुरुवात होताच रुग्णांची संख्या सुरू झाली. सद्यस्थितीत एकूण १९ बाधीत रुग्ण आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. खरे तर जिल्हा प्रशासनाने व पोलीस दलाने या काळात केलेले काम खरोखर वाखाणण्याजोगे आहे. अनेक अडचणी, आव्हाने असताना प्रशासनाने आपल्या कामाचा टेम्पो कायम टिकवून ठेवला. पण लॉकडाऊनच्या दुसºया टप्प्याचा शेवट व तिसºया टप्प्याची सुरुवात पाहता आगामी काळ अधिकच आव्हानात्मक ठरणार असल्याचे दिसते. त्यातील प्रमुख कारण म्हणजे सध्या बाहेरगावी व परराज्यात अडकेलेले लोक जिल्ह्यात परतू लागले आहेत. त्यातील बहुतांश लोक रेड झोन असलेल्या जिल्ह्यातूनही येत आहेत. त्यांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात येत असले तरी कोण हे नियम किती व कसे पाळणार तोही भाग महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वात मोठे आव्हान म्हणजे जवळपास ४० हजाराहून अधिक मजूर परराज्यात अडकलेले आहेत. त्यापैकी १५ हजारापेक्षा अधिक मजूर परतले आहेत. गेल्या चार-पाच दिवसात मोठ्या प्रमाणावर मजूर आले. सुरुवातीला ज्यावेळी अचानकपणे एक हजारपेक्षा अधिक मजूर गुजरातमधून जिल्ह्यात परतले त्यावेळी प्रशासनाची अक्षरश: धांदल उडाली होती. या मजुरांना जिल्ह्यात घ्यावे की नाही, त्यांना घेतल्यास क्वारंटाईन कसे करावे? असे अनेक प्रश्न प्रशासनासमोर होते. राज्य शासनाचीही सुरुवातीला तयारी नव्हती पण अनेक पातळीवर चर्चा झाल्यानंतर अखेर मजुरांना जिल्ह्यात घेण्यात आले व त्यांची तपासणी करून त्यांना त्यांच्या गावीच होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय झाला. आता त्याच निर्णयानुसार परराज्यातील येणाºया मजुरांची तपासणी केली जाते व त्यांना आपल्या गावी होम क्वारंटाईनसाठी पाठविले जाते. या धर्तीवर हजारो मजुरांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे आणि येत्या काही दिवसातही हजारो मजूर येणार असल्याने त्यांना अशाच पद्धतीने त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात येईल.
प्रश्न असा आहे की, जिल्ह्यातील बहुतांश मजूर हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. मुंबईतील धारावीपेक्षा येथील स्थिती वेगळी म्हणजे घरे व पाडे लांब-लांब असल्याने ती दिलासादायक असली तरी या भागात मात्र समस्यांचा अभाव असल्याने ती बाब चिंताजनक आहे. कारण पाड्यातील घरांमधील लोकांना पाणी घेण्यासाठी बाहेर नदी अथवा विहिरीवर रोज जावेच लागते. लाकडे आणण्यासाठी म्हणा किंवा इतर कुठल्याही कामासाठी त्यांना घरातच बसून उपजिवीका भागवता येणार नाही. दुसरीकडे स्थलांतरित परतलेल्या मजुरांना धान्य वाटपासह इतर सुविधांसाठी पुन्हा प्रशासनाला लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. आरोग्याची नियमित तपासणी अथवा निरीक्षण करावे लागणार आहे. सध्याच्या स्थितीतच दुर्गम भागातील काही आरोग्य केंद्रांना कुलूप असल्याचे निदर्शनास आले. अशा स्थितीत होम क्वारंटाईन असलेल्या प्रत्येक मजुरावर निरीक्षण ठेवणे म्हणजे प्रशासनासाठी सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.
मजूर परतल्याने त्यांच्यासाठी रोजगार हमीची कामे प्रशासनाने आधीच मंजूर केली असून त्याची तयारी केली आहे. ही एक चांगली बाब असली तरी रोजगार हमीच्या कामांवरही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिस्तीत काम करवून घेणे हेदेखील आव्हान राहणार आहे. सध्या पाण्याची टंचाई सर्वत्र जाणवू लागली आहे. तापमानाचा पारा ४१ ते ४३ अंश सेल्सीअसपर्यंत गेला आहे. अनेक पाड्यातील-गावातील विहिरी आटल्या आहेत. हातपंप कोरडे झाले आहेत. त्यामुळे लोकांना पाच ते सात किलोमीटरची पायपीट करीत पाणी आणावे लागत आहे. काही ठिकाणी तर लांब-लांब पाण्याची सुविधा नसल्याने पाण्याचे टँकर सुरू करण्याची आवश्यकता भासणार आहे. मे महिना म्हटला की सातपुड्यासाठी तो अधिकच आव्हानात्मक काळ म्हटला जातो. याच काळात आरोग्याचे प्रश्न आणि बालमृत्यूचे प्रश्नही गंभीर होतात. अशा सर्व आघाडींवर प्रशासनाला लक्ष केंद्रीत करीत कोरोनाचा संसर्ग रोखावा लागणार आहे. त्यामुळे येणारा काळ हा प्रशासनाबरोबरच सर्वांसाठीच कसोटीचा ठरणार आहे.