जिल्ह्यात पोस्ट कोविड सेंटरची पडली नाही गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 12:36 IST2020-11-12T12:36:29+5:302020-11-12T12:36:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्ण रिकव्हरी रेट ९२ टक्केपर्यंत पोहचला आहे. गेल्या चार महिन्यात हा रेट ...

जिल्ह्यात पोस्ट कोविड सेंटरची पडली नाही गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्ण रिकव्हरी रेट ९२ टक्केपर्यंत पोहचला आहे. गेल्या चार महिन्यात हा रेट ६५ ते ८० च्या दरम्यान राहिला आहे. कोरोनातून बरे होऊन पुन्हा त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी पोस्ट कोविड सेंटर इतर जिल्ह्यात सुरू असले तरी नंदुरबारात मात्र त्याची आवश्यकता पडली नसल्याचे चित्र आहे. येत्या काळात जर आवश्यकता पडलीच तर ते सुरू करण्यासाठी लागलीच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी संष्ट केले.
जिल्ह्यात आतार्यंत सहा हजार रुग्णांपैकी साडेपाच हजारापेक्षा अधीक रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांना नंतर काहीही त्रास झालेला नाही. ज्या रुग्णांना त्रास झाला नंतर तो बरा देखील झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत पोस्ट कोविड सेंटर सुरू झालेले नाहीत. तशी आवश्यकताही नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.
जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सरस आहे. तो येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काळात हा रेट ६५ टक्केपर्यंत होता. नंतर तो वाढून ८० टक्केपर्यंत पोहचला आता तो ९२ते ९४ टक्केच्या दरम्यान आहे. जिल्ह्यात एकुण कोविड उपचार केंद्रापैकी केवळ जिल्हा रुग्णालय आणि शहादा येथील शासकीय कोविड सेंटरमध्येच कोरोना रुग्ण आहेत. इतर शासकीय कोविड सेंटरमधील कोरोना रुग्ण नसल्याने ते बंद आहे. परंतु तेथील सेटअप तसाच ठेवण्यात आला आहे.
खाजगी रुग्णालयांपैकी नंदुरबार, शहादा आणि चिंचपाडा येथील खाजगी कोविड सेंटरमध्ये काही रुग्ण उपचार घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काय त्रास होतो?
दम लागणे, फुफुसात संसर्ग कायम राहणे, सर्दी वारंवार होणे, घसा वारंवार खवखवणे, सांधेदुखी असे त्रास पोस्ट कोविड रुग्णांना होऊ शकतात. मात्र हे त्रास व्हायरल इन्फेक्शनने देखील होतात. त्यामुळे डाॅक्टरांचा सल्ला घेणे आ्वश्यक आहे.
एकलव्य केंद्र बंद...
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी नंदुरबारातील एकलव्य रेशीडेन्सीअल स्कूलमध्ये सुरू करण्यात आलेला कक्ष रुग्ण नसल्याने बंद करण्यात आला आहे. आता केवळ जिल्हा रुग्णालयातील कक्षातच ६० ते ७० रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण हलका झाला.