दुर्गम भागांत इंटरनेटच नाही; मग ऑनलाईन शिक्षण आहे कुठे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST2021-07-09T04:20:32+5:302021-07-09T04:20:32+5:30
नंदुरबार : शाळा बंद परंतु शिक्षण सुरू असे शिक्षण विभाग म्हणत असले तरी ग्रामीण तसेच सातपुड्याच्या दुर्गम ...

दुर्गम भागांत इंटरनेटच नाही; मग ऑनलाईन शिक्षण आहे कुठे...
नंदुरबार : शाळा बंद परंतु शिक्षण सुरू असे शिक्षण विभाग म्हणत असले तरी ग्रामीण तसेच सातपुड्याच्या दुर्गम भागांत सर्वच अलबेल असल्याचे चित्र आहे. शाळांमध्ये इंटरनेटची सोय नाही, विद्यार्थ्यांच्या गाव, पाड्यांवर इंटरनेटची सोय नाही मग ऑनलाईन शिक्षण सुरू तरी आहे कुठून असा प्रश्न सहाजिकच पडत आहे. तब्बल ४५ टक्के शाळा ऑनलाईनअभावी ठप्प असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
नंदुरबार जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या दोन हजारांपेक्षा अधिक आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सूचना आहेत. शहरी भागात तसेच सपाटीवरील काही भागांत असे शिक्षण अनेक शाळांकडून दिले जात आहे; परंतु ग्रामीण आणि दुर्गम भागात मात्र ऑनलाईनचा कुठलाही मागमूस नसल्याचे चित्र आहे. काही शिक्षक प्रामाणिकपणे शाळांमध्ये जाऊन तसेच गावांत घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना अभ्यास देत आहेत. यासंदर्भात आता शिक्षणाधिकारी यांनीच प्रत्येक शाळेचा आणि शिक्षकांचा यासंदर्भातील आढावा घ्यावा, अशीही मागणी पालकवर्गातून होत आहे.
जिल्ह्यात ४५ टक्के शाळेत इंटरनेट नाही
n जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास १५०० आणि माध्यमिक विभागाच्या जवळपास ६०० शाळा आहेत. त्यातील ४५ टक्क्यांपेक्षा अधिक शाळांच्या गावांमध्ये इंटरनेटची सोयच नाही.
n त्यामुळे शिक्षकांना शाळेतूनच ऑनलाईन शिक्षण देण्याच्या निर्णयाचा जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावरील शाळांमध्ये अंमलबजावणीच होत नसल्याची स्थिती आहे.
n शहरी भागातील शासकीय तसेच खासगी माध्यमाच्या शाळांमधून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे; परंतु ग्रामीण भागात इंटरनेटची अडचण, कधी स्पीड कमी असणे तर कधी रेंज व वीजपुरवठाच राहत नसल्याने ऑनलाईनचा फज्जा उडत आहे.