गोमाई पुलावर पाण्याचा निचरा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:41 IST2020-06-10T12:40:13+5:302020-06-10T12:41:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान असलेल्या गोमाई नदी पुलावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच राहिली ...

गोमाई पुलावर पाण्याचा निचरा नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान असलेल्या गोमाई नदी पुलावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच राहिली नसल्याचे दिसून येत आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुंना सुमारे दोन ते तीन इंच एवढा मातीचा थर जमला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी निचरा होण्याकरीता जागा शिल्लक नसल्याने पावसाळ्यात या पुलावर धोका निर्माण होऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्गावरील प्रकाशा ते शहादा या गावांना जोडणारा डामरखेड्या जवळ गोमाई नदीवर पूल असून, सद्य:स्थितीत या पुलाची दयनिय अवस्था झाली आहे. तसेच पुलाच्या संरक्षण कठड्यांना तडे गेले असून, काही ठिकाणी सिमेंट निघाले आहे. तसेच इतर ठिकाणी लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत.
दरम्यान, या पुलाच्या जॉईनच्या ठिकाणी मोठी खाच पडली असून, पुलावर ठिकाणी लहान मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून अवजड वाहन गेल्यास पुलाला हादरा बसतो. त्यामुळे पुलाचे आयुष्यदेखील कमी होत असून, संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून पावसाळा सुरू होण्यापूर्वी या पुलाच्या दुरूस्तीसाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.
एवढेच नव्हे तर आता पावसाळा सुरू होत असून, या पुलावर पावसाचे पाणी साचल्यास चिखलाचे साम्राज्य तयार होईल. त्यामुळे या मार्गावरून वाहन काढतांना वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागते. तसेच पुलाचे आयुष्यही कमी होईल. त्यामुळे संबंधितांनी या पुलावरील मातीचा थर काढल्यास पावसाळ्यात पाणी साचणार नाही, अशी अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच या पुलावरील अपघातास कारणी भूत ठरू पाहणाऱ्या खड्ड्यांवर डांबरीकरण करून वाहनधारकांना सोयीचे करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.