सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:54+5:302021-07-07T04:37:54+5:30

नंदुरबार : हवामान खात्याने यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षादेखील अधिक पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, जुलैपर्यंत तरी हवामान ...

Tell me, Bholanath, will it rain? | सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

नंदुरबार : हवामान खात्याने यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षादेखील अधिक पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, जुलैपर्यंत तरी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना दिसून येत नाही. जुलै महिना उजाडला असतानादेखील पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात २१ टक्के पेरण्या झाल्या असून, यातील निम्मे क्षेत्रावर आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

जिल्ह्यात यंदा तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, कापूस तसेच नवीन ऊस लागवड करण्यासाठी शेतकरी मेपासून सज्ज झाले होते. पाऊस चांगला येणार असा अंदाज असल्याने ३५ हजार ९५० हेक्टरवर पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. यातही एक लाख पाच हजार ६६१ हेक्टरपैकी १७ हजार ४५३ हेक्टरवर कापूस लागवड पूर्ण झाली आहे. पावसाअभावी १६ टक्के कापूस लागवड झाली आहे. कापूस लागवडीचे क्षेत्र पाऊस पडल्यानंतर वाढण्याचा अंदाज आहे. पोषक असलेला पाऊसच आलेला नसल्याने पेरणी केलेली पिकेही सध्या धोक्यात आहेत. पाऊसच नसल्याने पिके कोेमेजू लागली आहेत. बागायती क्षेत्रात पाण्याची उपलब्धता असली तरी मे महिन्यापासून भूजल खालावले असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. यातून त्यांच्याही पिकांवर अवकळा पसरत आहे. कोरड क्षेत्रातील शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहेत.

यंदा धान्य पिकांना पसंती

जिल्ह्यात कापूस पिकाला सर्वाधिक पसंती व प्राधान्य दिले जाते. परंतु गेल्या वर्षातील लाॅकडाऊन व अन्य अडचणींमुळे यंदा धान्य पिकांना पसंती दिली जात असल्याचे चित्र आहे. पाऊस नसतानाही १३ हजार १०८ हेक्टर क्षेत्रात धान्य पिके आहेत. यात सर्वाधिक सहा हजार ८६१ क्षेत्रात मका पेरणी पूर्ण झाली आहे.

..तर दुबार पेरणी अटळ

जिल्ह्यात जून महिना पूर्णपणे उलटूनही पाऊस झालेला नाही. यामुळे पेरणी करणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. सर्व सहा तालुक्यात सरासरी ६९.१ मिलीमीटर पाऊस झाला असून, सर्वच मंडळात कोरड्या दिवसांची संख्या अधिक आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १० जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचे सांगितले जात आहे.

पावसाची आकडेवारी खालावली

जिल्ह्यात आजअखेरीस सर्व सहा तालुक्यात ६९.१ टक्के पाऊस झाला आहे. यात नंदुरबार तालुक्यात ७१.३, नवापूर ८८, शहादा ३५.८, तळोदा ६२.६, धडगाव ४१.६ तर अक्कलकुवा तालुक्यात ३८.९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पावसाच्या बळावर पेरण्या शक्यच नसल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात येत्या काळात पाऊस यावा यासाठी पारंपरिक नवस, धोंडी काढणे यासारखे उपक्रमही होत असल्याची माहिती दिली जात आहे. सर्वाधिक कमी पाऊस शहादा तालुक्यात झाला आहे.

यंदा पाऊसच नसल्याने चिंता निर्माण झाली आहे. पिकांची पेरणी अर्ध्यावर आहे. सर्वच शेतकरी बेजार झाले आहेत. सोयाबीन बियाणे घरात पडले आहे. शेत कसून तयार आहे. परंतु पाऊसच नाही. ढग भरून येतात; पण नाहीसे होतात. शेतकऱ्यांच्या जिवाची घालमेल वाढत आहे. गेल्या दोन वर्षात पाऊस होता; पण पिकाला भावच नव्हता.

-पुरुषोत्तम रामदास चव्हाण, मोड, ता. तळोदा

पाऊस हुलकावणी देत असल्याने चिंता वाढत आहेत. शेतात पेरणी केलेल्या बियाणाला साधा काेंबही फुटलेला नाही. दुबार पेरणीचे संकट आहे. पाऊस आणखीन लांबल्यास काय, असाही प्रश्न आहे. यंदा खूप मोठे संकट उभे ठाकले आहे. आधीच शेतीचा खर्च वाढला असल्याने वाढीव कर्ज घेत शेतकऱ्यांनी साहित्य खरेदी केली आहे.

-राेहिदास मराठे, विखरण, ता. नंदुरबार

पावसाची टक्केवारी कमी आहे. पाऊस लांबला आहे. परंतु पावसाचा येण्याचा अंदाज असल्याने शेतकरी नियमित पीकपद्धतीनुसार वाटचाल करू शकतात. परंतु जर पावसाचा खंड वाढला तर मात्र शेतकऱ्यांनी मका आणि तूर या पिकांसोबत जावे, शेतकरी बाजरीचीही लागवड करू शकतात. कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले जात आहे.

-एन.डी. भागेश्वर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

Web Title: Tell me, Bholanath, will it rain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.