कोरोना नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करा - पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:27 IST2021-03-14T04:27:57+5:302021-03-14T04:27:57+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जि. प. अध्यक्षा सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. ...

कोरोना नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करा - पालकमंत्री
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जि. प. अध्यक्षा सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पंडा, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते.
ॲड. पाडवी म्हणाले, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी मास्कचा वापर करत नसल्यास वाहनचालकांवर कारवाई करावी, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्येही मास्कचा वापर बंधनकारक करावा, कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची स्वॅब चाचणी तातडीने करावी, आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यावर भर द्या, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधत कडक कारवाई करण्यात यावी, कोरोनाबाधित आढळलेल्या गावात विशेष शिबिराचे आयोजन करून ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात यावी, बाहेरगावी विवाह सोहळ्यासाठी एकत्रितपणे जाणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवावे, जिल्ह्यात रॅपिड अँटिजेन चाचणीसाठी २४ पथके स्थापित करण्यात आली असून, त्यापैकी १० नंदुरबार, ८ शहादा, ३ नवापूर आणि ३ पथके तळोदा शहरात कार्यरत आहेत. प्रत्येक पथकाला दर दिवशी २०० चाचण्या करण्याच्या सूचना आहेत. कोरोना मृत्यूदर आतापर्यंत सर्वात कमी आहे. ७३ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. सध्या १२ लसीकरण केंद्रे सुरू असून, १३ खासगी लसीकरण केंद्रांचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
डोंगराळ भागात फळबाग लागवडीवर भर द्यावा
पालकमंत्र्यांनी यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेतला. ते म्हणाले, धडगाव, अक्कलकुवा, तळोदा आणि शहादा तालुक्यातील डोंगराळ भागात फळबाग लागवडीवर भर द्यावा. नवीन पाझर तलाव तयार करणे आणि पाझर तलाव दुरुस्तीची कामे घ्यावीत. डोंगर उतारावरील मातीचा थर कायम रहावा, यासाठी उतारावर वृक्ष लागवड करावी. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी मधमाशी पालनसारख्या जोड व्यवसायांवर भर द्यावा. यावेळी कृषी विभागाच्या योजना, विकेल ते पिकेल, एक जिल्हा एक पीक, उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई, वनहक्क कायद्यांतर्गत वैयक्तिक व सामुदायिक वनदावे, वणव्यापासून वनांचे संरक्षण, रस्ते दुरुस्ती, सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अन्नधान्य पुरवठा आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जलजीवन मिशनबाबत बैठक संपन्न
पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशनअंतर्गत आराखडा मंजूर करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, खासदार डॉ. हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, सहायक जिल्हाधिकारी अविशांत पंडा, वसुमना पंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील डोंगराळ भाग लक्षात घेता, आराखड्यात आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या.