जिल्ह्यात कोरोनावर तातडीने उपाययोजना करा- भाजपची पालकमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST2021-04-12T04:27:57+5:302021-04-12T04:27:57+5:30
पालकमंत्री अॅड. के. सी.पाडवी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. ...

जिल्ह्यात कोरोनावर तातडीने उपाययोजना करा- भाजपची पालकमंत्र्यांकडे मागणी
पालकमंत्री अॅड. के. सी.पाडवी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. प्रतिदिन १० ते १५ व्यक्ती मृत्युमुखी पडत असून, सरासरी २००० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. यात स्वॅब देऊन, सिटीस्कॅन करून व अॅन्टीजेन कीटचा समावेश आहे. अत्यंत भयावह अशी जिल्ह्याची परिस्थिती असून प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे. कधी नव्हे, अशी नरकयातना नागरिकांना भोगावी लागत आहे. यासाठी सर्वप्रथम मागेल त्याला रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक कोरोना रुग्णाला बेड उपलब्ध करून द्यावे, जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे व रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, खासगी रुग्णालयांना सातत्याने रेमडेसिविर उपलब्ध करून द्यावे. मागेल त्या रुग्णालयांना कोविड रुग्णासाठी परवानगी द्यावी. ५ एम.डी. डॉक्टर, परिचारिका, स्टाफ यांची भरती करण्यात यावी, लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, चौकाचौकांत तसेच प्रत्येक प्रभागातील समाजमंदिर व शाळांचे वर्ग उपलब्ध करून लसीकरणाची मोहीम जोमाने करावी, लसीकरणाबाबत जनतेला जागृत करण्याकामी मोठ-मोठ्या फलकांद्वारे जनजागृती करावी, लसीकरण केंद्रावर एकाच वेळी १० लोकांची लस देण्यासंदर्भात सोय करावी, जेणेकरून लस वाया जाणार नाही, जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात उपलब्ध बेडची माहिती अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात यावी, गेल्यावर्षीच्या कोरोनाकाळात केंद्र शासनाने ज्याप्रमाणे आर्थिक सवलती दिल्या होत्या त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने राज्यातील गोरगरीब जनतेसाठी आर्थिक सवलती उपलब्ध करून द्याव्यात.