संशयीत ४० शिक्षकांवरही कारवाई करा अन्यथा आत्मदहन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:13 IST2020-02-11T13:13:10+5:302020-02-11T13:13:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील ७१ शिक्षकांची नियुक्ती ही बनावाट असल्याचे जिल्हा परिषदेच्या अहवालात सिद्ध ...

संशयीत ४० शिक्षकांवरही कारवाई करा अन्यथा आत्मदहन करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील ७१ शिक्षकांची नियुक्ती ही बनावाट असल्याचे जिल्हा परिषदेच्या अहवालात सिद्ध झालेले असतांना केवळ ३१ शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले. उर्वरित ४० शिक्षकांना पाठीशी घातले जात असून एसआयटीच्या अहवालाच्या अधीन राहून त्यांच्या पगारही सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहे. ४० जणांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा ३१ शिक्षक जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करतील असा इशारा या शिक्षकांनी दिला आहे.
सोमवारी या शिक्षकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले व धरणे आंदोलन केले. निवेदनात म्हटले आहे की, २०१७ मध्ये अपंग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत ७१ शिक्षकांचे समायोजन करून घेतले गेले होते. १९ जानेवारी २०१८ च्या ग्रामविकास उपसचिवांच्या पत्राने १५ फेब्रुवारी रोजी नंदुरबार पोलीस ठाण्यात ३१ शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले.
उर्वरित ४० शिक्षकांना मोकळे सोडले ही शोकांतिका आहे. सर्वच ७१ जणांची नियुक्ती जण बनवाट होती तर ३१ जणांवरच अन्याय का?, ४० जणांना पाठीशी घालण्याचे कारण काय?.
संबधीत ४० जणांच्या वेतनासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करीत आहे. २६ डिसेंबरच्या पत्रानुसार शिक्षण विभागाकडे आपण वेतनाविषयी मार्गदर्शन मागविले आहे. एसआयटी निकालाच्या अधीन राहून हे शिक्षक स्टॅम्प लिहून देण्यास तयार आहेत, तसे आम्हीही तयार आहोत.
३१ शिक्षकांवर जसे गुन्हे दाखल केले तसे या ४० शिक्षकांवरही कारवाई करावी, चौकशी करून त्यांची सेवा समाप्ती करून गुन्हे दाखल करावे. १५ दिवसात याबाबत कार्यवाही झाली नाही तर गुन्हे दाखल असलेले सर्व ३१ शिक्षक जिल्हा परिषदेसमोर सामुहिक आत्मदहन करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सर्व ३१ शिक्षकांच्या सह्या असून त्यांनी यावेळी काही काळ धरणे देखील धरले.