विद्यार्थ्यांना उजळणी, बाराखडीचा पडू लागला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST2021-04-28T04:32:59+5:302021-04-28T04:32:59+5:30
मार्चपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नयेत म्हणून शासनाने ऑनलाइन शिक्षणाची सुविधा केली आहे; परंतु हे ...

विद्यार्थ्यांना उजळणी, बाराखडीचा पडू लागला विसर
मार्चपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नयेत म्हणून शासनाने ऑनलाइन शिक्षणाची सुविधा केली आहे; परंतु हे शिक्षण म्हणावे तसे प्रभावी राहिले नाही. ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मोबाइल हातात पडतात. मुले पे-गेम, कार्टून यांसारख्या खेळात रंगू लागली आहेत, तसेच जास्तीत जास्त वेळ टीव्हीवर वेगवेगळा कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवत आहेत. शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण प्रभावी असल्याने दुसरीपासूनच मुलांना उजळणीचा विसर पडू लागला; परंतु आता शाळेपासून दुरावलेल्या मुलांना जोडशब्दांचे वाचन करणे कठीण जाऊ लागले आहे. चौथी पाचवीच्या मुलांना भागाकार आणि गुणाकार कसा करायचा, या विसर पडला आहे. जून महिन्यात शाळेकडून पाठ्यपुस्तके वाटप झाली; परंतु कोणत्याही विषयाच्या पुस्तकाचे पान उघडून न पाहणाऱ्या मुलांना यंदा कोणते धडे अभ्यासासाठी आहेत, हे सुद्धा माहिती नाही. ऑनलाइन शिक्षण केवळ २० ते ३० टक्के विद्यार्थी प्रामाणिकपणे करीत असावेत; परंतु इतरांचे काय? त्यातही यावर्षी परीक्षा रद्द झाल्याने मुले तेवढीच बिनधास्त झाली. परीक्षाच नाही तर अभ्यास कशाला करायचा, असे प्रतिउत्तर मुलेच पालकांना देऊ लागली आहेत. यापेक्षा वास्तव अनुभव यावा म्हणजे यावर्षी जून महिन्यात इयत्ता पहिली वर्गात नवीन प्रवेश देण्यात आले; पण वर्षभर शाळा बंद असल्याने या विद्यार्थ्यांनी शाळा पाहिली नाही किंवा गुरुजींची भेट झाली नाही, तसेच बाराखडी अक्षरे वाचली नाही तरी ही मुले आरटीई कायद्यातील नियमाप्रमाणे दुसरीत प्रविष्ट झाली. शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना दीक्षा ॲप, गुगल मीट यांसारख्या शैक्षणिक साधनांचा वापर करण्यास प्रवृत्त करण्यात आले; परंतु विद्यार्थ्यांनी त्याकडे नियमित पाठ फिरविली. ज्ञानाची ही पोकळी भरून काढण्यासाठी आता येणाऱ्या पुढील काळात शिक्षकांना मात्र चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
नव्या शैक्षणिक सत्रात कसरत
मागील वर्षापासून शैक्षणिक सत्र विस्कळीत झाले. त्यामुळे सर्वच विद्यार्थी अभ्यासापासून दुरावले आहेत. साहजीकच त्यांच्या ज्ञानाच्या पातळीत मोठा फरक जाणवत आहे. परिणामी, भविष्यात या विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिक्षकांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.