आज व उद्या कडकडीत बंद; लाॅकडाऊनची सवलत दोन दिवस नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:27 IST2021-04-03T04:27:04+5:302021-04-03T04:27:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी लाॅकडाऊन करण्यात आले असले तरी त्यात अनेक आस्थापनांमध्ये सवलती दिल्याने गेले ...

आज व उद्या कडकडीत बंद; लाॅकडाऊनची सवलत दोन दिवस नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी लाॅकडाऊन करण्यात आले असले तरी त्यात अनेक आस्थापनांमध्ये सवलती दिल्याने गेले दोन दिवस लाॅकडाऊनचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. मात्र दर शनिवार आणि रविवारचा जनता कर्फ्यू कायम असल्याने हे दोन दिवस अतिशय कडकडीत बंद ठेवण्यासाठी व कारवाईसाठी पोलीस दल ‘ॲक्शनमोड’मध्ये आला आहे. लोकांना त्याची पूर्व सूचना व्हावी यासाठी शुक्रवारी स्वत: पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी रस्त्यावर येऊन लोकांना विनंती केली. दरम्यान, यापुढे नियम मोडणाऱ्यांची गय नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या साडेसहा हजारावर गेली आहे. नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच १ ते १५ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊनचा आदेश दिला आहे. या लाॅकडाऊनच्या काळात लोकांच्या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक सवलती दिल्या आहेत. त्यामुळे शहरी भागात दुपारी एकपर्यंत बाजारपेठेत प्रचंड गर्दी असते. एक नंतरदेखील शहरात फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. या काळात दुकाने बंद पण लोकांची रहदारी सुरू असे चित्र असते. बहुतांश जण अजूनही मास्क न लावता रस्त्यावर फिरतात अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडालेला दिसतो. पहिल्या दिवशीची लोकांमधील बेफिकिरीचा अनुभव घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले व रस्त्यांचा ताबा घेतला.
या वेळी पोलिसांनी बेपर्वाईने फिरणाऱ्या नागरिकांना समज दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तर स्वत: अशा लोकांना हात जोडून विनंती केली. दुपारी पोलिसांच्या या भूमिकेनंतर सायंकाळी मात्र थोडा प्रभाव जाणवला. पण विना कामाने फिरणाऱ्यांची संख्यादेखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दिसून आली आहे. या वेळी उपविभागाीय पोलीस अधिकारी सचिन हिरे व शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकरसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
शनिवार-रविवार जनता कर्फ्यू कायम
लाॅकडाऊनच्या काळातही दर शनिवार आणि रविवारचा या पूर्वी जाहीर केलेला जनता कर्फ्यू कायम ठेवण्यात आला आहे. लाॅकडाऊनमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत काही सेवांसाठी सवलती देण्यात आली आहे. मात्र जनता कर्फ्यूत जीवनावश्यक सेवा वगळता इतर सेवा पूर्ण बंद राहणार असल्याने सकाळी सात वाजेपासून कडकडीत बंद ठेवावा लागणार आहे.
जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाने निर्बंध लावले आहेत. मात्र नागरिकांमध्ये त्याबाबत बेफिकिरी दिसून येत आहे. त्यामुळे आपण स्वत: रस्त्यावर विना कामाने फिरणाऱ्या लोकांना आज विनंती केली आहे. आज सर्वांना समज दिली. परंतु यापुढे मात्र कठोर कारवाई करण्यात येणार आहे. विशेषत: इतर कारवाईपेक्षा दंडात्मक कारवाईवर भर देण्यात येणार आहे. किमान त्यामुळे तरी नागरिकांना समज येईल व दुसऱ्यांदा नियम मोडणार नाही.
- महेंद्र पंडित, जिल्हा पोलीस अधीक्षक, नंदुरबार