वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर प्रयत्नांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:21 IST2021-02-19T04:21:19+5:302021-02-19T04:21:19+5:30
शहादा शहरात सामाजिक व आर्थिक गुन्हेगारी डोके वर काढत आहे. शांतताप्रिय शहर अशी ओळख असलेल्या या शहराची शांतता ...

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर प्रयत्नांची गरज
शहादा शहरात सामाजिक व आर्थिक गुन्हेगारी डोके वर काढत आहे. शांतताप्रिय शहर अशी ओळख असलेल्या या शहराची शांतता काही महाभागांमुळे शहराची धोक्यात येत आहे. त्यांना वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. गेल्या महिन्यात शहरात वास्तव्यास असलेल्या दोघांना मुंबई पोलिसांनी अवैध शस्त्र विक्रीप्रकरणी मुंबईत अटक केली. त्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक शहाद्यात येऊन गेले. याचाच अर्थ शहरात अवैध शस्त्र विक्री होत असावी, असा कयास लावला जात आहे. त्याचाही शोध घेणे गरजेचे आहे. भविष्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुन्हेगारांवर वचक असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा, ताडी व मद्य विक्री होत असून त्याचाही बिमोड करणे गरजेचे आहे. शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. योग्य नियोजनाअभावी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. भररस्त्यात वाहने लावून नागरिक बाजारासाठी गावात जातात. शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलीस नियुक्त करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी वाहतूक पोलीस ड्युटीवर असतानाही वाहनांवर कारवाई होत नाही. दिलेल्या पॉईंटवर वाहतूक पोलिसांची नियुक्ती असताना वाहतूक सुरळीत का होत नाही असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत. शहरात काही तरुण भरधाव वेगाने वाहन रस्त्यावर चालवतात. सद्या बुलेट वाहनाची क्रेज युवकांमध्ये वाढली असून बुलेटला वेगवेगळ्या कर्कश आवाजाचे हॉर्न लावून रस्त्यावर भरधाव चालवतात. त्यामुळे इतर वाहनचालक, पादचारी यांना या हॉर्नच्या आवाजाचा त्रास सहन करावा लागतो. अनेक दुचाकींना नंबर प्लेट नाहीत, काहींकडे वाहन परवाना नाही. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर योग्य व कडक कारवाई झाली तर शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्येबरोबर गुन्हेगारीही वाढत आहे. संवेदनशील भागात अधूनमधून किरकोळ वाद सुरू असतात. भविष्यात हे वाद मोठे स्वरूप प्राप्त करू शकतात. रात्रीच्यावेळी टारगट युवकांच्या टोळ्या शहरातील काही भागात घोळक्याने उभे राहून धिंगाणा घालतात. त्यांचाही बंदोबस्त करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री केली जाते. त्यातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत तर काहींचे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शहरात गेल्या पंधरवड्यात दोन समाजात किरकोळ वाद निर्माण होऊन एक मोटारसायकल जाळल्याची घटना खेतिया रोडलगत असलेल्या मिशन बंगल्यासमोर घडली. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना ठरली. शहरात वेगवेगळ्या भागात होणाऱ्या किरकोळ भानगडीही शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित निर्माण करणाऱ्या ठरत आहेत. शहरातील कुकडेल परिसर, गरीब-नवाज वसाहत, डोंगरगाव रस्ता, भोई गल्ली आदी भागात स्वतंत्र पोलीस चौकी अथवा २४ तास पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने गुटखा, ताडी व मद्याची होणारी अवैध विक्री थांबविणे, टारगट युवकांवर कारवाई, घरफोड्या, चोरीच्या इतर घटनांना पायबंद व सुरळीत वाहतुकीसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी शहादा पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.