गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने ग्रामीण भागात पुन्हा पेटू लागल्या चुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST2021-03-18T04:30:31+5:302021-03-18T04:30:31+5:30
रांझणी : दिवसेंदिवस गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे गॅस वापरणे सर्वसामान्य कुटुंबांना कोरोना काळात तर अधिकच कठीण होऊन बसले आहे. ...

गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने ग्रामीण भागात पुन्हा पेटू लागल्या चुली
रांझणी : दिवसेंदिवस गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे गॅस वापरणे सर्वसामान्य कुटुंबांना कोरोना काळात तर अधिकच कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे गृहिणींकडून अनेक ठिकाणी चूल पेटविण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे गॅस शेगडी व सिलिंडर या निव्वळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. याआधी स्वयंपाकासाठी गोवऱ्या व सरपण मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात येत होते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जावा, या उद्देशाने केंद्र सरकारकडून उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गोरगरिबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले होते तसेच गोरगरिबांकडूनही स्वयंपाकासाठी दैनंदिन गॅसचाच वापर करण्यात येत होता. परंतु, गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे घरात लागणारा किराणा, भाजीपाला यांचा ताळमेळ बसवताना तसेच रोजगाराचा अभाव यामुळे गॅस सिलिंडर घेणे अवघड ठरत आहे. शेतातील कापसाच्या काड्या, तूरच्या काड्या, गोवऱ्या याकडे गृहिणींनी आता मोर्चा वळवला असून, सध्यातरी त्याचा सरपण म्हणून वापर करण्याला पसंती दिली आहे.
गृहिणींनी उज्ज्वला योजनेतून सिलिंडर मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. या याेजनेंतर्गत सध्या ग्रामीण भागात गॅस सिलिंडर सेवा घरपोच सुरू आहे. परंतु, महागलेला गॅस खिशाला परवडणारा नसल्याने नवीन सिलिंडर घेण्यात अडचणी येत आहेत. या योजनेतील गोरगरीब लाभार्थींकडून कमी दरात गॅस सिलिंडर उपलब्ध करुन द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.