दिवसभर थांबवले पण निर्णय मात्र नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:13 PM2020-02-26T13:13:22+5:302020-02-26T13:13:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सरदार सरोवर पकल्पांतर्गत काही कुटुंबांचे मोड ता. तळोदा येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यापैकी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : सरदार सरोवर पकल्पांतर्गत काही कुटुंबांचे मोड ता. तळोदा येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यापैकी १२ जणांना शेतीसाठी निझर (गुजरात) तालुक्यातील उभद येथे जमिनी देण्यात आल्या. परंतु याच जमिनी असल्याचे न भासवता सह्या-अंगठे घेत खराब जमिनीच्या ताबा पावत्या टपालाद्वारे देण्यात आल्या. याबाबत तोडगा काढण्यासाठी चर्चेसाठी दिवसभर प्रतिक्षा करुनही तोडगा निघाला नसल्याने त्यांच्या समस्या कायम आहे.
सरदार सरोवर प्रकल्पात बुडीताखाली येणाऱ्या सिंदुरी, गमण, अट्टी येथील प्रकल्प बाधितांचे मोड येथे २०१६ मध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यापैकी १२ बाधितांना निझर तालुक्यातील उभद शिवारातील जमिनी देण्यात आल्या. या जमिनी देतांना तळोदा ते शहादा हा महामार्ग जात असल्याचे भासवून चांगली जमिन देण्यास टाळण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षाच देखील चांगली जमिन न देता तापी नदीच्या पुरात बुडीताखाली येणारी जमिन या बाधितांच्या नावावर करण्यात आली. शिवाय बळजबरी सह्या अंगठे घेत त्या जमिनीच्या ताबा पावत्या टपालाद्वारे पाठवत फसवणूक केल्याचे बाधितांनी सांगितले. त्या जमिनीत खाण्यापुरतेही पिके घेता येत नसल्याची व्यथा मांडत त्यांनी त्या जमिनी ताब्यात घेण्यास नकार दिला.
जमिनीबाबत बाधितांशी चर्चा करण्यासाठी सरदार सरोवर प्रकल्पाचे अधिकारी व गुजरातमधील अधिकारी उभद येथे येणार असल्याने बाधित सकाळीच शेतावर पोहोचले होते. दिवसभर उपाशीपोटी उन्हात थांबूनही गुजरातचे अधिकारी आले नव्हते. अधूनमधून संपर्क केला असता निघाले आहे, रस्त्यात आहे असे उत्तर मिळत होते. अखेर संबंधित अधिकारी न येता त्यांच्या खालच्या कर्मचाऱ्यांना पाठवले. बाधितांसोबत नंदुरबारचे अधिकारीही त्यांच्या प्रतिक्षेत ताटकळत थांबले होते. असे असतांनाही तोडगा निघाले नसल्याने अखेर संतप्त बाधितांनी तेथून काढता पाय घेतला. पन्हा त्यांना सकाळीच चर्चासाठी निमंत्रित करण्यात येण्याची शक्यता आहे.
सबंधित नागरिक सकाळपासूनच आले होते. शिवाय नंदुरबार जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी देखील चर्चेच्या ठिकाणी दाखल झाले होते. गुजरातचे संबंधित अधिकारी मात्र वारंवार संपर्क केल्या असता रस्त्यातच असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्ष संबधित अधिकारी न येता त्यांच्या हाताखालील कर्मचारी दाखल झाल्याने बाधितांची तीव्र नाराजी व्यक्त केली. ही चर्चा २७ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असल्याने या तीन दिवसात होणाऱ्या निर्णयाकडे लक्ष लागले.
खराब जमिनीच देणार असल्याचे भासू न देता ससप्र बाधितांच्या सह्या अंगठे घेण्यात आल्याचा आरोप चचर्चेसाठी उपस्थित झालेल्या नागरिकांनी केला असून यातून या बाधितांची मोठी फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर नेमका काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागून आहे.