एसटी सज्ज परंतु, प्रवासी येईनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:38 IST2021-04-30T04:38:41+5:302021-04-30T04:38:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लाॅकडाऊनमध्ये गरजू प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील चारही आगारांमध्ये दरदिवशी बसेस तैनात केल्या जात आहेत. परंतु, ...

एसटी सज्ज परंतु, प्रवासी येईनात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लाॅकडाऊनमध्ये गरजू प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील चारही आगारांमध्ये दरदिवशी बसेस तैनात केल्या जात आहेत. परंतु, बाहेरगावी जाण्यासाठी प्रवासीच येत नसल्याने १ एप्रिलपासून जिल्ह्यात एकही बस धावलेली नाही.
लाॅकडाऊन काळात प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून बसेस सुरू ठेवण्याचे आदेश होते. एकापेक्षा अधिक प्रवासी एका मार्गासाठी तातडीची कारणे घेऊन आल्यास त्यांना बसेस उपलब्ध करून देण्याची सोय करून देण्यात आली आहे. त्यानुसार नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा आणि नवापूर आगारांतून प्रत्येकी १० बसेस तैनात ठेवल्या जात आहेत. या बसेसमधून एकापेक्षा अधिक प्रवासी ठोस कारणासह समोर आल्यास प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या २८ दिवसांपासून बंद असलेल्या बसेसमुळे चारही आगारांचे आतापर्यंत १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातून धावणाऱ्या बसेसचे चारही आगार मिळून दिवसाचे उत्पन्न हे सरासरी ४० लाख रुपये एवढे आहे. गेल्यावर्षी लाॅकडाऊननंतर सुरू झालेल्या एसटीने दिवाळीत भरारी घेतली होती. परंतु, आता पुन्हा एसटी बंद पडल्याने समस्यांमध्ये वाढ झाली आहे. लाॅकडाऊन संपल्यानंतर एसटीचे कामकाज सुरू झाल्यावर उत्पन्नाचे आकडे पूर्ववत करण्याचे आव्हान एसटीसमोर राहणार आहे. नंदुरबार आगारातून दिवसभरात मिळणारे साधारण १२ लाख, शहादा आगारातून ११, अक्कलकुवा ८ तर नवापूर आगारातून मिळणारे ९ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे. आगारांचे उत्पन्न बंद असल्याने कर्मचारी वेतनावर परिणाम होण्याची शक्यता होती. परंतु, अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण आलेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. एसटी बंद असली तरी चारही आगारांचे सर्व चालक, वाहक, यांत्रिकी, लिपिक कर्मचारी कामावर येत आहेत.
बसेस स्थानकात राहतात सज्ज
प्रवाशांच्या सोयीसाठी चारही आगारात बसेससोबत प्रत्येकी १० चालक आणि वाहक तैनात करुन ठेवण्यात आले आहेत.
वैद्यकीय कारणासह इतर तातडीच्या कारणांसाठी बसेसमधून प्रवास करण्यास मुभा असली तरी गेल्या २८ दिवसांत एकाही प्रवाशाने आगारांमध्ये संपर्क केलेला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील बहुतांश प्रवासी हे खासगी प्रवासी वाहनांमधून प्रवास करत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.
कर्मचारी बसेस बाहेर
आवश्यक त्या कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आलेली असल्याने हे कर्मचारी सकाळी सात वाजेपासून कर्तव्यावर हजर होत आहेत. नंदुरबार व शहादा तसेच नवापूर येथून बसेस सुटण्याची शक्यता होती. परंतु, येथूनही बसेस सुटलेल्या नाहीत.
एसटी महामंडळाच्या आदेशानुसार कामकाज सुरू आहे. सकाळी किमान १० बसेस स्थानकात लावून ठेवण्यात येतात. या बसेससाठी कर्मचारीही तैनात असतात. परंतु, प्रवासी मात्र अद्याप मिळालेले नाहीत. एकापेक्षा अधिक प्रवासी आल्यास बसेस सोडल्या जातील, तशी तयारी आगाराने केली आहे. वैद्यकीय कारणांसाठी कागदपत्रे तपासली जातील.
-मनोज पवार, आगारप्रमुख, नंदुरबार