चारही आगारातून आठ कंटेनरद्वारे होणार एस.टी.ची माल वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:47 IST2020-06-08T11:47:03+5:302020-06-08T11:47:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एस.टी.महामंडळाने मालवाहतुकीच्या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर नंदुरबार आगारानेही ही सेवा सुरू केली आहे. मालवाहतुकीची पहिली ...

चारही आगारातून आठ कंटेनरद्वारे होणार एस.टी.ची माल वाहतूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एस.टी.महामंडळाने मालवाहतुकीच्या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर नंदुरबार आगारानेही ही सेवा सुरू केली आहे. मालवाहतुकीची पहिली एस.टी.रविवारी येथील आगारातून रवाना करण्यात आली.
लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यापासून प्रवाशांची जीवनवाहिनी अर्थात लालपरी आगारात उभी होती. अशात मजुरांना पोहचविण्याची जबाबदारी मात्र पार पाडली. कोट्यावधी रुपयांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने मालवाहतूकीचा निर्णय घेतला. त्यानुसार नंदुरबार आगाराने देखील मालवाहतूक क्षेत्रात दमदार पदार्पण केले. रविवारी पहिली मालवाहू एस.टी.अर्थात कंटेनर असली, ता. धडगाव येथे रवाना करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस राज्यातील शहरी तथा ग्रामीण भागातील प्रत्येक प्रवाशाची जीवनवाहिनी बनली आहे. त्यामुळे एसटीने देखील आता प्रवासी वाहतूकीबरोबरच मालवाहू क्षेत्रात पदार्पण केले आहे. रविवारी नंदुरबार आगारातून पाठवण्यात आलेल्या पहिल्या मालवाहू ट्रक प्रसंगी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक किशोर साळुंके, वाहतूक निरीक्षक रमेश वळवी, वाहतूक नियंत्रक प्रशांत गुजराथी, लिपिक प्रकाश बागुल, शाकीर शेख, चालक चंद्रकांत मोरे, हारुन सय्यद आदी उपस्थित होते. जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणी एसटीतर्फे मालवाहू सेवा उपलब्ध असून अधिक माहितीसाठी नंदुरबार आगार, शहादा, नवापूर व अक्कल्कुवा आगारात संपर्क साधण्याचे आवाहन नंदुरबार आगारातर्फे करण्यात आले आहे. गेल्या ७२ वर्षाच्या इतिहासात यंदा प्रथमच कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ सोसावी लागली.
राज्य परिवहन महामंडळाच्या अधिसूचनेद्वारे मालवाहतुकीचा निर्णय घेण्यात आला असून नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी प्रचलित दराप्रमाणे अत्यंत माफक दरात सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. विविध व्यवसायिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन धुळे विभागीय नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी केले आहे.
नंदुरबार आगारातून प्राथमिक टप्प्यात आठ मालवाहू ट्रक सुरू करण्यात आले आहे. यात नंदुरबार-२, शहादा- २, नवापूर-३, आणि अक्कलकुवा एक याप्रमाणे नियोजन आहे. पहिला मालवाहू ट्रक सातपुड्यात पाठवून मालवाहू सेवेचा श्रीगणेशा करण्यात आला तर दुसरा ट्रक सोमवार ८ जुन रोजी सातारा येथे रवाना होणार आहे. जिल्ह्यातील व्यापारी वर्गासह नागरिकांना देखील मालवाहू सेवा फायदेशीर ठरणार असल्याचे आगार प्रमुख मनोज पवार यांनी सांगितले.