सोयाबीनची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST2021-07-01T04:21:56+5:302021-07-01T04:21:56+5:30

तळोदा : तालुक्यातील पश्चिम भागाकडे तीन ते चार दिवसांपूर्वी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीस सुरुवात केली आहे. ...

Soybean scarcity worries farmers | सोयाबीनची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी हैराण

सोयाबीनची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी हैराण

तळोदा : तालुक्यातील पश्चिम भागाकडे तीन ते चार दिवसांपूर्वी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीस सुरुवात केली आहे. तथापि सोयाबीनचे बियाणे कृषी दुकानांमध्ये उपलब्ध नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. यंदा ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल राहणार असल्याने सोयाबीनच्या पेरा वाढला आहे. परंतु नेमके सोयाबीनची टंचाई निर्माण झाली आहे. कृषी विभागाने याप्रकरणी ठोस उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शासनाच्या हवामान विभागाने यंदा पावसाचे चांगले भविष्य वर्तविले असले, तरी प्रत्यक्षात तळोदा तालुक्यात जून महिना संपला असला, तरी अजून जोरदार पाऊस झालेला नाही. साहजिकच शेतकऱ्यांच्या खरिपातील पेरण्यादेखील लांबल्या आहेत. वास्तविक बळीराजा पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपून पेरणीसाठी सज्ज झाला आहे. मात्र पावसाने त्याचा चिंतेत भर घातली आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील पश्चिम भागात समाधानकारक पाऊस पडला आहे. साहजिकच तेथील शेतकऱ्याने पेरणीची कामे हाती घेतली आहेत. परंतु सोयाबीन पिकाचे बियाणे बाजारात उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणीच पळाले आहे. कारण यंदा शेतकऱ्यांनी उसाचे नियोजन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल तिकडेच आहे. त्यातही सोयाबीनचा पालापाचोळा बिवाड होत असल्यामुळे या पिकाकडेच शेतकऱ्यांचा भर असतो. नेमके त्याचे बियाणे बाजारात मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. वास्तविक यंदा १० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागानेच व्यक्त केला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या बियाण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करून नियोजन करण्याची आवश्यकता होती. तथापी वरूनच सोयाबीन बियाणांचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले आहे. येथील कृषी विभागाने तालुक्यात यंदा सोयाबीनच्या एक हजार २०० हेक्टर पेऱ्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यापूर्वीच शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांच्या टंचाईस सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, कृषी विभागाने यापूर्वीच कंपन्यांकडील खराब सोयाबीन बियाणांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे बाजारात विक्री न करता पेरणीसाठी राखून ठेवण्याचे आवाहन केले होते. परंतु या बियाणांवर रासायनिक प्रक्रिया नसल्यामुळे त्याच्या उगवण शक्तीवर शेतकऱ्यांच्या मनात शंका होती. त्यामुळे शेतकऱी सोयाबीन विक्री करून टाकल्याचे सांगतात.

काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट

कंपन्यांकडूनच सोयाबीनच्या बियाणांचे उत्पादन झाले नसल्याने निश्चितच तुटवडा भासणार असल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ज्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांनी शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक लूट सुरू केली आहे. तीस किलोच्या गोणीस पूर्वी तीन हजार ३०० रुपये होते. आता तीन हजार ९०० रुपये आकारले जात आहेत. तेही आगाऊ बुकिंग करून घेतले जात आहे. शेतकरी महागड्या भावाबाबत कृषी दुकानदारांस विचारतात, तेव्हा कंपनीचा भाव आहे, असे सांगितले जात असते. इकडे शेतकऱ्यास बियाणांची गरज असल्यामुळे नाईलाजास्तव घ्यावे लागत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. त्याचवेळी शेतकरी एवढ्या रकमेचे बिल मागतात तेव्हा दिले जात नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या भरारीपथकाने दखल घेण्याची मागणी आहे. दरम्यान, तळोदा तालुका खरेदी-विक्री संघातदेखील सोयाबीनचे बियाणे संपल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील काही खासगी व्यावसायिक मनमानीपणे बियाणांची महागड्या दराने विक्री करीत आहेत.

उसाची लागवड करण्याचे नियोजन केले असल्यामुळे बिवडासाठी सोयाबीनचा पालापाचोळा उत्तम असतो. त्यामुळे सोयाबीन पेरणीच निश्चित केली आहे. नेमके बाजारात सोयाबीनचे बियाणे मिळत नसल्याने चिंता वाढली आहे. कृषी विभागाने बियाणे उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. - सुनील माळी, शेतकरी, तळोदा.

खराब बियाणांच्या पार्श्वभूमीवर यंदा पुरेसे बियाणे उपलब्ध होणार नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पुढील खरीप हंगामासाठी राखून ठेवण्याचे आवाहन केले होते. तरीही शेतकऱ्यानी मूग, उडीद यासारख्या पिकांवर भर द्यावा. - नरेंद महाले, तळोदा तालुका कृषी अधिकारी, कृषी कार्यालय, तळोदा.

Web Title: Soybean scarcity worries farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.