सात दिवसात २४ पोल्ट्रीत पावणेसहा लाख कोंबड्या नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:01 IST2021-02-15T12:00:55+5:302021-02-15T12:01:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूर तालुक्यात फेब्रुवारी २००६ नंतर दुसर्यांदा ६ फेब्रुवारी २०२१ ला बर्ड फ्लू चा शिरकाव ...

सात दिवसात २४ पोल्ट्रीत पावणेसहा लाख कोंबड्या नष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : नवापूर तालुक्यात फेब्रुवारी २००६ नंतर दुसर्यांदा ६ फेब्रुवारी २०२१ ला बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याने आठवड्याभरात राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन नवापूरातील २४ पोल्ट्रीत राबविण्यात आले. यात एकूण ५ लाख ७८ हजार ८९० कोंबड्या नष्ट केले तर २५ लाख १३ हजार ३९२ अंडी नष्ट करण्यात आली आहे. उर्वरित पाच पोल्ट्रीतील किलिंग ऑपरेशन पुढील आदेश आल्यावर मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.
नवापूर शहरातील २४ पोल्ट्री फॉर्म मध्ये लाखो कोंबड्या व अंडी नष्ट करण्यात आली आहे. बर्ड फ्यू ग्रस्त परिसरातील पोल्ट्रीत निर्जंतुकीकरण करण्याचे काम काही व्यवसायिकांनी सुरू केले आहे. तर काही व्यवसायिकांनी निर्जंतुकीकरणाचा कामाला अजून सुरुवात केलेली नाही पोल्ट्री फार्म मधील पडलेली विष्टेत पाणी साचल्याने विष्टा कुजते किडे पडतात. ते खाण्यासाठी बगळे, कावळे इतर पक्षी येत असतात त्यातून इतर पक्षांना बर्ड फ्लूची लागण होऊ शकते या संदर्भात पोल्ट्रीतील विष्टा पडलेल्या भागामध्ये जाळीने पूर्ण बंदिस्त करणे गरजेचे आहे.असे तज्ज्ञ म्हणतात परंतू काही पोल्ट्रीत जाळ्या नादुरुस्त अवस्थेमध्ये दिसून आले आहेत. तेथे पक्षी शिरतात. त्यापासून धोका होऊ शकतो. प्रशासनाचे किलिंग ऑपरेशनाचे काम झाले असेल तरी योग्य उपाययोजनांबाबत पोल्ट्रीत व्यावसायिकांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे.
नवापूर परिसरातील पोल्ट्रीतील लाखो कोंबड्या नष्ट करण्यात आल्या असल्या तरी १० किलोमीटर त्रिज्येतील तालुक्यातील करंजी खुर्द, वाकीपाडा, विजापूर, लहान चिंचपाडा, एक किलोमीटर मधील गाव,जामने, जामतलाव, घोडजामने, कोठडा, काळंबा, मावचीफळी, किलवणपाडा, तीन किलोमीटर अंतरावरील गाव नांदवण, बेडकीपाडा, बंधारफळी पाच किलोमीटर अंतरावरील गाव,रायंगण, रायपुर, बोकळझर, पायरविहीर, गडद, बिलमांजरे बंधारपाडा, आमपाडा या दहा किलोमीटर त्रिज्येतील गावातील देशी कोंबडी बदक व इतर पक्षी टप्प्याटप्प्याने जमा करण्यासाठी केवळ पहिल्या दिवशी ग्रामीण भागात दवंडी फिरवण्यात आली होती. पुढे ग्रामीण भागात काय करवाई होईल याबाबत संभ्रम कायम आहे. ग्रामीण भागातील ग्रामसेवक व तलाठी यांची टिम तयार करण्यात आली होती. ग्रामीण भागात कोंबड्यांची मरतूक नाही आहे.
कोंबड्या जमा व नष्ट करू नका असे सांगण्यात आले होते. तूर्त ग्रामीण भागातील पक्षी संकलन देखील थांबण्यात आले आहे. पुढे शासन काय निर्णय घेता हे नंतरच कळले. २००६ मध्ये नवापुर शहरातील पाळीव पक्षी पोपट, कबुतर व इतर पक्षी जमा करण्यात आले होते. यंदा मात्र या पक्ष्यांबाबत काहीही कार्यवाही झाली नाही.