खान्देशात अक्षय तृतीया सणाला महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST2021-05-12T04:31:20+5:302021-05-12T04:31:20+5:30

वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेच्या सणाला गौराईची पूजा बांधली जाते. चैत्र महिन्याच्या चतुर्दशीस खान्देशात घरोघरी गौराईची मांडणी केली ...

Significance of Akshay Tritiya festival in Khandesh | खान्देशात अक्षय तृतीया सणाला महत्त्व

खान्देशात अक्षय तृतीया सणाला महत्त्व

वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेच्या सणाला गौराईची पूजा बांधली जाते. चैत्र महिन्याच्या चतुर्दशीस खान्देशात घरोघरी गौराईची मांडणी केली जाते. ग्रामीण भागात या सणाला खूपच महत्त्व आहे. सासुरवाशिणी या सणाला आवर्जून माहेरी येतात. चैत्रात वसंत फुलतो, लहान मुले-मुली व तरुणांमध्ये आनंदाचे उधाण असते. हातात टिपऱ्या घेऊन गाणे म्हणत गौराईची स्तुती करीत या मुली नदीकाठाने गौराईला प्रसन्न करण्यासाठी वेशीच्या आत असलेल्या नदी-नाल्यावर जातात. गौराईला अहिराणीत ‘गवराई’ म्हणतात. गौरी हे पार्वतीचे रूप मानले जाते. गौरी ही आर्यांची ‘सौंदर्य देवता’ म्हणून मानली जाते.

गौराईची मांडणी

गौराईची प्रतिकृती लाकडाची तयार केलेली असते. दरवर्षी चैत्र महिन्याच्या चतुर्दशीपूर्वी गौराईला स्वच्छ पाण्याने धुतले जाते. गौराईचा मुखवटा कोरलेल्या दोन छोटे साधारणत: दहा-अकरा इंचीचे दोन लाकडी भाग व त्याच लाकडाला खाली एक फळी, दोन बारीक लाकडांच्या साहाय्याने जोडलेल्या असतात. लाकडी फळीवर सुंदर नक्षीकाम केलेले असते. पौर्णिमेच्या दिवशी विधिवत पूजा करण्यापूर्वी गौराई ज्या ठिकाणी मांडायची आहे ती जागा शुभ्र मातीने सारवून घेतली जाते. मुली व स्त्रिया सोयीनुसार नक्षीकाम चित्रे काढतात. त्याला ‘गौराईचे घर’ म्हणतात. पाट टाकूनही गौराई बसवतात. गौराईला बाशिंग बांधतात.

गौराईचे बार...

दररोज सकाळी गावातल्या सर्व कुमारिका व सासरहून आलेल्या मुली तांब्या व खाऊ घेऊन टिपऱ्यांच्या आवाजात नदीकडे जातात. नदीवर जवळपासच्या गावाच्या मुलीही आलेल्या असतात. नदीकाठावर गाणे म्हणता-म्हणता शिव्याही सुरू होतात. त्याला खानदेशात ‘गौराईचे बार’ खेळणे म्हणतात. खेळ खेळताना मुली एकमेकीला घाणेरडे शब्द वापरतात. नदीतून किंवा नदीकाठी असलेल्या विहिरीवरून पाण्याचा तांब्या भरून त्यावर आंब्याची पाच पाने व एक कच्ची कैरी ठेवतात, याला ‘डवणा’ म्हणतात. घरी आल्यावर आंब्याची कोवळी पाने गौराईपुढे ठेवतात व पाणी तुळशीला टाकतात. अशा रीतीने १५ दिवस म्हणजे अक्षय तृतीयेपर्यंत हा खेळ सुरू राहतो.

गौराईची पूजा

गौराईच्या पूजेत रोज वेगवेगळ्या पदार्थांची माळ असते. टरबूज, डांगर व काकडीच्या बिया, आंब्याची लहान कैरी, गहू, हरभरा, शेंगा, मुरमुरे, बिस्कीट, शेव, शेवग्याच्या (सौंदळ) शेंगांची माळ आदी विविध प्रकारच्या माळा केल्या जातात. अक्षय तृतीयेच्या अगोदरच्या दिवशी सांजोऱ्या, करंज्या, कणकेच्या पुतळ्यांच्या माळा करून गौराईला घालतात. त्याचदिवशी मुली दोन पिवळे फडके करून ताटलीत धान्य घेऊन कुंभाराकडे जातात. कुंभाराकडे मातीच्या घोड्यावर एका मातीच्या माणसाला बसवले असल्याची प्रतिकृती असते. त्याच्यामागे डोक्यावर छत्रीसारखे केलेले असते. त्याला ‘शंकर’ असे म्हणतात. तो शंकर मुली घरी आणतात. तो गौराईचा पती असतो. गौराईला घेण्यासाठी आलेला असतो. मुली १५ दिवस झोक्यावर बसून गाणे म्हणून हा सण अतिउत्साहात साजरा करतात. अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सर्व मुली शंकर व गौराईला नदीवर नेतात. शंकराला नदीत टाकून गौराईला घरी आणतात. गौराई त्या दिवसापासून सासरी गेली असे समजतात.

गौराईची गाणी

गौराईची गाणी अत्यंत श्रवणीय आहेत. गौराई ही नवसाची देवता नाही. गौराईची काही निवडक गाणी खान्देशात प्रसिद्ध आहेत.

केशर झणझणनी-

सोनानी सुतळी तडे मना कनेर पाणी भरणे व ।

केशर झणझणनी तटे मनी गौराई न्हायनी व।

गौराईनी माळ-

वाटेवर हिर कुणी खंदी व माय शंकर राजाने खंदणी व माय...

कसाना भरी उना ताट-

कसाना भरी उना ताट, ताट मनी गौराईले।

शिय्यासना भरी उना ताट, ताट मनी गौराईले।।

(या गाण्यात लाडू, जलेबी, कलाकंद यासह विशिष्ट पदार्थांची नावे घेऊन गाणे म्हटले जाते.)

आथानी कैरी तथानी कैरी-

आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय व।

कैरी तुटनी खडक फुटणा, जुई जुई पाणी व्हाय व।

गौरी पाणीले जाय-

चैत्र वैशाख अणे कथा खोकत जाय आज मनी गौर पाणीले जाय...

आदी गीते गाऊन माहेरवाशीण मुली आपला आनंद व्यक्त करतात आणि हा आगळा-वेगळा सण उत्साहात साजरा केला जातो.

Web Title: Significance of Akshay Tritiya festival in Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.