सलग आठ तास दुकाने सुरु राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 11:18 IST2020-05-20T11:18:42+5:302020-05-20T11:18:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याने २२ मे पासून जिल्हांतर्गत बससेवा व ...

सलग आठ तास दुकाने सुरु राहणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याने २२ मे पासून जिल्हांतर्गत बससेवा व दुकाने सलग आठ तास सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यंनी दिले आहेत़ या निर्णयामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे़
आंतरजिल्हा बससेवेबाबत शासनाकडून सूचना आल्यानंतर आदेश काढण्यात येणार आहेत़ औषधांची दुकाने, खाजगी रुग्णालये सुरु राहणार आहेत़ टॅक्सी, कॅब आणि रिक्षा, खाजगी चारचाकी वाहने यांना वाहतूकीसाठी केवळ केवळ चालक आणि दोन प्रवासी, तर मोटारसायकलवर केवळ एकाच व्यक्तीला परवानगी देण्यात आली आहे़ सर्व प्रकारची मालवाहतूक, शहरी आणि ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे़
शहरातील सर्व दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, जीवनावश्यक वस्तूंसाठीची ई-कॉमर्स सेवा, खाजगी कार्यालये, शेती संदर्भातील कामे, बँक, कुरीअर आणि डाक सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, घरपोच सेवा देणारे हॉटेल्स, उपनिबंधक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालये सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे़ शासकीय कार्यालयात १०० टक्के उपस्थिती ठेवण्याचे आदेश आहेत़ व्यायामासाठी क्रीडांगणे सुरू राहतील़ येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे़
सभा संमेलने बंदच राहणार
दरम्यान रेल्वे, आंतरराज्य बससेवा, आंतरजिल्हा बससेवा, शॉपींग मॉल्स, चित्रपटगृहे, प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार आणि आॅडीटोरीअम, सभागृहे पूर्वीप्रमाणे बंद राहतील. जिल्ह्यात सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, ऊरूस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, आठवडे बाजार भरण्यास बंदी कायम असणार आहे. धार्मिक कारणासाठी एकत्र होण्यासही बंदी असेल.
विवाहसोहळा, अंत्यविधी यात ५० पेक्षा अधिक नागरिक सहभागी होणार नाहीत व ते सहभागी झाल्यास कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे़ थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखूचे सेवन करण्यावर बंदी असणार असल्याचे कळवण्यात आले आहे़ आदेशांचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे़
जिल्ह्यात सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही नागरिकास आवश्यक बाब वगळता इतर कारणासाठी बाहेर फिरण्यास बंदी असेल. ज्येष्ठ नागरिक, १० वर्षाखालील मुले आणि गर्भवती महिलांना बाहेर फिरण्यास अनुमती राहणार नाही. केवळ आरोग्यविषयक कारणांसाठी त्यांना बाहेर निघता येईल. प्रतिबंधीत क्षेत्रात केवळ मालवाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहे़
सार्वजनिक ठिकाणी वावरतांना नागरिकांनी मास्क किंवा रुमाल वापरणे बंधनकारक आहे. एकेठिकाणी ५ पेक्षा अधिक नागरिक जमा होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना काढण्यात आलेल्या आदेशात करण्यात आल्या आहेत़
जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व प्रकारची दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत सुरु राहणार आहेत़ यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज नाही़ दुकान मालकांनी कोरोनाविषयक सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा दिलेली मान्यता रद्द करण्यात येईल. विविध भागातील हॉटेलमधील पार्सल सेवेलाच परवानगी देण्यात आली आहे़