शिवसेनेला कुणी कमजोर समजू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:38 PM2019-12-15T12:38:35+5:302019-12-15T12:38:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूक महाविकास आघाडीद्वारे लढण्याचा प्रयत्न आहे. पक्ष जो आदेश देईल त्यानुसार निर्णय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूक महाविकास आघाडीद्वारे लढण्याचा प्रयत्न आहे. पक्ष जो आदेश देईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल. परंतु कुणी शिवसेनेला कमजोर समजत असेल तर आम्हीही आमची ताकद दाखवून देवू, सर्वच ५६ जागांवर निवडणूक लढविण्याची शिवसेनेचीही तयारी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलतांना केले.
शिवसेनेचा जिल्हा मेळावा व इच्छुकांच्या मुलाखती शनिवारी दुपारी नंदुरबारातील संजय टाऊन हॉलमध्ये झाला. यावेळी जिल्हा प्रमुख डॉ.विक्रात मोरे, आमशा पाडवी, माजी जि.प.सदस्य विजय पराडके, जेलसिंग पावरा, भाऊ राणा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेनेने एकत्र लढविली होती. परंतु निवडणुकीनंतर गणिते बदलली आणि महाविकास आघाडी निर्माण झाली. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक देखील महाविकास आघाडीमार्फत लढविण्याचा प्रयत्न आहे. पक्ष जो आदेश देईल त्यानुसार निवडणूक लढविली जाईल. परंतु शिवसेना आग्रही आहे म्हणून कुणी कमजोर समजत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. शिवसेनाही ५६ जागांवर लढण्यास तयार आहे. त्यामुळे सर्वच जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. नवापूर पालिका पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी पुढे आली आहे. एक जागा काँग्रेस व एक जागा शिवसेना भाजपविरोधात लढवत आहे. त्यामुळे आघाडीचा फायदा हा तिन्ही पक्षांना मिळणार आहे. परवा काँग्रेसच्या मेळाव्यात स्वबळाची भाषा बोलली गेली. परंतु तसे होणार नाही. कुणी गुर्मी दाखवत असेल तर ती गुर्मी उतरविण्यातही शिवसेना सक्षम असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.
पक्ष कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. गुणवत्तेनुसार आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच तिकीट देण्यात येणार आहे. कुणी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पक्ष सन्मानाने निरोप देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांनी एकसंघपणे आणि पुर्ण ताकदिनीशी शिवसेना या निवडणुकीत लढणार आहे. चंद्रकांत रघुवंशी यांनी ज्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला त्याच दिवशी जिल्हा परिषदेवर भगवा फडकविणार असल्याचा आमचा विश्वास निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
आमशा पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन गजेंद्र शिंपी यांनी केले.