शहादा तालुक्यात वनकर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत सात हेक्टरचे जंगल तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST2021-07-23T04:19:39+5:302021-07-23T04:19:39+5:30
तालुक्याच्या पूर्व भागातील लंगडी भवानी परिसरात ७० हेक्टर जागेवर वनविभागाचे राखीव वनक्षेत्र आहे. या ठिकाणी गेल्या पाच वर्षात ३३ ...

शहादा तालुक्यात वनकर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत सात हेक्टरचे जंगल तोडले
तालुक्याच्या पूर्व भागातील लंगडी भवानी परिसरात ७० हेक्टर जागेवर वनविभागाचे राखीव वनक्षेत्र आहे. या ठिकाणी गेल्या पाच वर्षात ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात खैर साग आदी महत्त्वपूर्ण वृक्षांची लागवड करण्यात आली होती. रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान वनरक्षक दीपक परदेशी हे काम करत असताना अचानक दोनशे ते अडीचशे जणांचा जमाव त्यांच्या दिशेने आला. मद्याच्या नशेत असलेल्या या जमावाकडे प्राणघातक धारदार शस्त्रे होती. जमावाने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांंसमोर शस्त्रांच्या सहाय्याने वृक्षतोडीला प्रारंभ केला. पाहता पाहता सुमारे एक तासाच्या आत या जमावाने सात हेक्टर वनजमिनींवरील डेरेदार वृक्षांची कत्तल करून पळ काढला.
या जमावाला वृक्षतोड करू नका असे वनविभागाचे कर्मचारी ओरडून सांगत असतानाही तुम्ही रस्त्यातून बाजूला व्हा, अन्यथा तुमचा रक्तपात करू अशी धमकी दिली. कोणत्याही प्रकारचे शस्त्र नसलेल्या वनकर्मचाऱ्यांनी निमूटपणे एका बाजूला थांबून हा प्रकार डोळ्यादेखत पाहिला. एक तासाच्या वृक्षतोडीनंतर हा जमाव तेथून पसार झाला
वनविभागाने याबाबत अज्ञात जमावावर गुन्हा दाखल केला असून लंगडी भवानी व शहाणा या दोन गावातील ग्रामस्थांच्या हद्दीच्या वादावरून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. जमावाने केलेल्या या प्रकारामुळे हजारो डेरेदार वृक्ष तुटून पडल्याचे यावेळी दिसून येत होते.
तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरातील जंगलांवर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीच्या घटना घडत आहे वनविभागाचे कर्मचारी या वृक्षतोडीला आळा घालण्यास असमर्थ ठरले आहे. विशेष म्हणजे शहादा वनक्षेत्रपाल हे पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असून या पदाचा अतिरिक्त कार्यभार राणीपूरचे वनक्षेत्रपाल एस. के. खुणे यांच्याकडे असून ते नियमितपणे शहादा कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची माहिती आहे. काही ठिकाणी वनविभागाच्या प्रोत्साहनाने तर काही ठिकाणी जमावामार्फत वृक्षांची कत्तल होत असतानाही वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने जंगलाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असल्याने वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक अज्ञात व्यक्तींचा जमाव राखीव वनक्षेत्रात आला. त्यांच्या हातात प्राणघातक धारदार शस्त्र होती. जमावाने वृक्षतोडीला प्रारंभ केला असता माझ्यासह वनमजुरांनी त्यांना वृक्षतोड करू नका असे सांगितल्यानंतर जमावातील काहींनी आम्हाला धमकावले व सांगितले की, तुम्ही आमच्या रस्त्यातून बाजूला व्हा अन्यथा वृक्षाप्रमाणे तुमचीही कत्तल करू. आमच्याकडे जीव वाचवण्याचे व सुरक्षिततेचे कुठलेही साहित्य नसल्याने आम्ही प्रचंड मानसिक तणावात होतो. अवघ्या एक तासात या बेफाम जमावाने सुमारे सात हेक्टर जागेवरील वृक्षतोड केली असल्याची माहिती वनरक्षक दीपक परदेशी यांनी दिली.