एक हजार स्थलांतरीत नागरिकांचे स्कॅनिंग ‘नेगेटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:14 IST2020-04-06T12:13:46+5:302020-04-06T12:14:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : परराज्य, मोठी शहरे आणि परदेशातून जिल्ह्यात आलेल्या १ हजार पेक्षा अधिक नागरिकांचे आरोग्य यंत्रणेने ...

Scanning over 1,000 migrant citizens 'negative' | एक हजार स्थलांतरीत नागरिकांचे स्कॅनिंग ‘नेगेटिव्ह’

एक हजार स्थलांतरीत नागरिकांचे स्कॅनिंग ‘नेगेटिव्ह’

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : परराज्य, मोठी शहरे आणि परदेशातून जिल्ह्यात आलेल्या १ हजार पेक्षा अधिक नागरिकांचे आरोग्य यंत्रणेने स्कॅनिंग करत त्यांच्यातील किरकोळ आजारांवर उपचार देत त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला होता़ या सर्व नागरिकांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह असल्याचे समोर आले असल्याने मोेठा दिलासा मिळाला आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची लक्षणे असल्याने ४८ जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले होते़ यातील ४३ जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत़
जगभर कोरोनाचे थैमान सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातून नोकरी व्यवसायनिमित्त परदेशात गेलेले नागरिक परतीला लागले होते़ याचदरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर पुणे, नाशिक, मुंबई यासह लगतच्या गुजरात राज्यात गेलेले स्थलांतरीत नागरिक गावाकडे परत आले होते़ त्यांच्या परतण्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढवली होती़ तब्बल २२ हजार ८०० नागरिकांची नोंद झाल्याने त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या़ यातील किरकोळ आजार असलेल्यांचे स्कॅनिंग करुन प्रशासनाने त्यांच्या आजारांवर लक्ष ठेवले होते़ गेल्या १० ते ११ दिवसांपासून त्यांच्या कोरोनासारखी इतर कोणतीही लक्षणे न दिसून आल्याचा अहवाल समोर आल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे़ यामुळे जिल्ह्यात सध्या एकही कोरोनाबाधित नागरिक नसल्याचे स्पष्ट झाले आहे़ यापुढे केवळ बाहेरुन येणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवली जाणार असून त्यांच्या किरकोळ आजारांचे स्कॅनिंग करण्यावर भर दिला जाणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे़
दरम्यान जिल्ह्यात स्थलांतरीतांचे लोंढे येणे सुरुच असल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे़ प्रशासनाने जागोजागी पोलीस बंदोबस्त करुन नाकाबंदी केली असतानाही परराज्यातून येणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून आले आहे़ जिल्हा आरोग्य विभागाने गेल्या शुक्रवारी नोंद केलेल्या आकड्यांमध्ये सातत्याने वाढ होत असून या नागरिकांच्या तपासण्या करण्यावर भर ेदेण्यात येत असल्याची माहिती आहे़
एकीकडे बाहेरगावाहून आलेल्याा नागरिकांच्या प्रकृती ठिक असल्याचे स्पष्ट असल्याचे समोर येत असताना दुसरीकडे आरोग्य विभागाचा भोंंगळ कारभार अद्यापही सुरु असल्याची माहिती समोर आली आहे़ आरोग्य विभागाकडून गेल्या आठवड्यापासून आशा आणि अंगणवाडी सेविका यांना सर्वेक्षणासाठी घरोघरी पाठवण्यात येत आहे़ परंतू यातील निम्म्यापेक्षा अधिक महिलांकडे मास्क आणि सॅनेटायझर नसल्याचे समोर आले आहे़ त्यांच्याकडून मागणी करुनही पुरवठा नसल्याचे कारण देत साहित्य दिले जात नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत़ याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे़

किरकोळ आजाराची कोणतीही लक्षणे नसल्याने दिलासा

आरोग्य विभागाला पुण्या, मुंबईसह इतर राज्यातून स्थलांतरीत झालेल्या नागरिकांपैकी १ हजार ३०६ जणांमध्ये किरकोळ आजारांची लक्षणे दिसून आली होती़ सर्दी, खोकला, ताप यासह विविध लक्षणे असल्याने आरोग्य पथकांनी स्थानिक पातळीवर तपासण्या करुन त्यांचे स्कॅनिंग केले होते़ त्यांच्यावर पथकांनी लक्ष ठेवले होते़ त्यांच्यातील आजार पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांची माहिती आरोग्य यंत्रणेकडे पाठवण्यात येत होती़ यातून आतापर्यंत १ हजार ३०६ स्थलांरित नागरिकांची प्रकृती ही सुदृढ असल्याची माहिती देण्यात आली आहे़ त्यांच्यात किरकोळ आजारांचीही लक्षणे नसल्याचा अंतिम अहवाल आरोग्य विभागाने दिले आहेत़ यात परदेशातून आलेल्या ३७ नागरिकांचाही समावेश असून त्यांचे स्वॅब नमुनेही नेगेटिव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे़

Web Title: Scanning over 1,000 migrant citizens 'negative'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.