व्यसनमुक्तीच्या दिशेने पडले सातपुड्याचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:53 PM2019-12-16T12:53:53+5:302019-12-16T12:54:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महत्वाच्या सर्व कार्यातही दारुचा वापर केला जात असल्यामुळे दुर्गम भागात कदापी दारु बंद होणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महत्वाच्या सर्व कार्यातही दारुचा वापर केला जात असल्यामुळे दुर्गम भागात कदापी दारु बंद होणार नाही, असे म्हटले जात होते. परंतु मागिल महिन्यांपासून टप्प्या-टप्प्याने चार गावांमध्ये दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयांच्या प्रती पोलीस प्रशासनाकडेही देण्यात आली आहे. युवकांच्या पुढाकाराने चार गावे व्यसनमुक्त होत आहे.
दुर्गम भागात काही बनावट मद्य वगळता महूफुलांपासून निर्मित दारुचाच अवलंब केला जातो. महूफुलाची दारु सर्व कार्यात वापरली जाते तर बाहेरुन येणारे बहुतांश व्यक्तींकडून आयुर्वेदिक म्हणून या दारुचा अवलंब केला जातो. खरं तर ही दारू आयुर्वेदिक औषधच परंतु याच दारुचे प्रमाण अधिक झाले तर विष देखील ठरू लागते. या विषाचे वाईट परिणाम केवळ पिणाऱ्यावरच होत नसून अवघे त्याचे कुटुंबच उद्ध्वस्त होत असल्याची काही उदाहरणेही आहे. त्यात बहुतांश काही कुटुंबांचा संसार उघड्यावर आल्याचेही दिसून येत आहे.
युवकवर्गही या व्यसनात गोवले जात असल्याने समाजाचे मोठे नुकसान होत आहे, हे नुकसान टाळण्यासाठी धडगाव तालुक्यातील काही युवकांच्या पुढाकाराने गावे दारुमुक्त गाव करण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यात मागील महिन्यात खडकला, वावी, पाडामुंड या गावांमध्ये दारुबंदी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा टेंभूर्णी येथील युवकांनी दारुबंदीसाठी पुढाकार घेतला. या युवकांनी गाव पंचमंडळीच्या सभा घेत दारुविक्री व खरेदी करणाऱ्यांविरुद्ध कडक नियम घेतले. या अटींच्या ठरावाची प्रत पोलीस प्रशासनाकडेही देण्यात आली आहे. त्यामुळे दारुबंदीच्या आदर्श कामात पोलीस प्रशासनाचेही सहकार्य लाभणार आहे.