मास्कबाबतच्या जागृतीमुळे समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST2021-03-15T04:28:36+5:302021-03-15T04:28:36+5:30
धुळीमुळे नागरिक होताहेत त्रस्त नंदुरबार : प्रकाशा ते नंदुरबार दरम्यान कोरीट फाटा परिसरात रस्ता काम सुरू आहे. या रस्ता ...

मास्कबाबतच्या जागृतीमुळे समाधान
धुळीमुळे नागरिक होताहेत त्रस्त
नंदुरबार : प्रकाशा ते नंदुरबार दरम्यान कोरीट फाटा परिसरात रस्ता काम सुरू आहे. या रस्ता कामावर उडणारी धूळ सध्या नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देत कारवाई करण्याची अपेक्षा असून, धुळीमुळे दुचाकीस्वार त्रस्त आहेत.
भाजीपाला आवक मंदावली
नंदुरबार : उन्हाळा सुरू झाला असल्याने तालुक्यातून होणारी भाजीपाला आवक मंदावली आहे. तालुक्यातील अनेक भागांत भाजीपाला शेतीचा हंगाम आटोपत आहे. नवीन लागवड येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. परिणामी भाजीपाला आवक मंदावली असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या १५ दिवसांनंतर आवक पूर्ववत होण्याचा अंदाज आहे. आवक कमी झाल्याने दरांमध्येही काहीअंशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
ग्रामीण भागात घेतली जातेय दक्षता
रांझणी : तळोदा तालुक्यात कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी ग्रामस्थ दक्षता घेत आहेत. मास्कचा वापर तसेच घरी परतल्यावर हात धुणे यावर भर दिला जात आहे. ग्रामीण हद्दीत कोरोनाने शिरकाव केल्याने दक्षता घेत ग्रामस्थ स्वत:ची काळजी घेत असल्याचे दिसून आले आहे.
खासगी वाहनांच्या तपासणीची गरज
नंदुरबार : दुर्गम भागात चालविण्यात येणाऱ्या खासगी प्रवासी वाहनांची तपासणी करण्याची गरज आहे. यातील अनेक वाहने २० वर्षांपेक्षा अधिकच्या काळाची आहेत. या वाहनांचा प्रवास हा घाटामधून अधिक असल्याने त्यांची तपासणी आवश्यक आहे.
दुर्गम भागातील पाणीटंचाईवर कार्यवाही करा
धडगाव : तळोदा तालुक्यातील रोषमाळ येथे तीव्र पाणीटंचाई असल्याचे समोर आल्यानंतरही तातडीने कार्यवाही करण्याबाबत पाणीपुरवठा विभागाने पावले उचललेली नाहीत. यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. धडगाव पंचायत समितीकडून तालुक्यातील टंचाईग्रस्त गावे आणि पाडे यांचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे; परंतु यावर कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
रसवंतिगृहे सुरू
नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागात रसवंतिगृहे पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. हंगामी व्यवसाय असला तरी त्यातून रोजगार मिळत असल्याने अनेक जण रसवंतिगृहे चालवितात. साधारण ऑगस्ट महिन्यापर्यंत ही रसवंतिगृहे ऐनभरात चालत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
डिस्टन्सिंग हवे
नंदुरबार : परराज्यातील परिवहन विभागाच्या बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंग होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या बसेसच्या चालक व वाहकांना सूचना देत कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. खासकरून मध्य प्रदेशातून येणाऱ्या बसेसमध्ये सूचना करण्याची गरज आहे.