कोरोनाच्या भीतीने पाणी जार विक्रीवरही आली संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:13 IST2021-05-04T04:13:16+5:302021-05-04T04:13:16+5:30
नंदुरबार : कोरोनाकाळातील संचारबंदी व लॉकडाऊनमुळे पाणी जार विक्रीवरदेखील परिणाम झाला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी जार खरेदी बंद केली ...

कोरोनाच्या भीतीने पाणी जार विक्रीवरही आली संक्रांत
नंदुरबार : कोरोनाकाळातील संचारबंदी व लॉकडाऊनमुळे पाणी जार विक्रीवरदेखील परिणाम झाला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी जार खरेदी बंद केली आहे, तर संचारबंदीमुळे दुकाने, कार्यालये बंद असल्यामुळे जार विक्री निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. असे असले तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जार विक्री बऱ्यापैकी असल्याचे चित्र आहे. दरम्यान, विविध ठिकाणचे कोविड सेंटर्स, रुग्णालये या ठिकाणी पाणी जार विक्री बऱ्यापैकी होत असल्यामुळे जार विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचा अनेक व्यवसायांवर परिणाम झाला तसा पाणी जार विक्रेत्यांवरदेखील झाला आहे. दररोज हजारो लिटर फिल्टर केलेले पाणी विक्री करणारे आज शेकडो लिटरवर आले आहेत. पाणी फिल्टर करण्याचा खर्चदेखील काही जार विक्रेत्यांना परवडत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे पाणी जार विक्रेत्यांची आर्थिक बाजू डळमळीत झाली आहे. मुख्य उन्हाळ्याचा सीझन हा सर्वाधिक व्यावसायाचा असतो.
लग्नसमारंभ नसल्याने मोठा फटका
n पाणी जार विक्रेत्यांचा सर्वाधिक व्यावसाय हा लग्नसमारंभांच्या काळात होतो. एका लग्नसमारंभाच्या ठिकाणी किमान ३० ते जास्तीत जास्त २०० जार लागत असतात. त्यातून विक्रेते मोठा व्यवसाय करून घेतात. याशिवाय इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्येदेखील पाणी जारची मागणी मोठी असते. गेल्या दोन वर्षांपासून लग्नसमारंभांवर आलेली मर्यादा, सार्वजनिक कार्यक्रमांची बंद झालेली रेलचेल ही बाब लक्षात घेता अनेक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. नजीकच्या काळातदेखील लग्नसमारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी राहणार असल्याचे स्पष्टच आहे.
कोरोनामुळे भीतीच्या वातावरणाचाही परिणाम
n कोरोनामुळे बाहेरील वस्तू आणताना अनेक जण विचार करतात. आणलीच तर सॅनिटाइझ करून घेतात. परंतु पाणी कसे सॅनिटाइझ करणार हा प्रश्न असतो. त्यामुळे कोरोनाकाळात पाणी जार नको अशी अनेकांची धारणा आहे.
n याशिवाय दुकाने, हॅाटेल्स, बिअरबार, इतर कार्यालये बंद असल्यामुळे तेथे विक्री होणारे पाणी जारदेखील बंद ठेवावे लागले आहेत. त्यामुळे व्यवसाय निम्म्यावर आला आहे. जूनपासून पावसाळा सुरू झाल्यावर पाणी जारची मागणी कमी होणार आहे.
कर्जबाजारी होण्याची वेळ...
n अनेक व्यावसायिकांनी बॅंकेची कर्ज काढून पाणी जार विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. परंतु दोन वर्षांपासून व्यावसायच होत नसल्यामुळे त्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. याबाबत विक्रेत्यांनी खंतही व्यक्त केली आहे.