उन्हाच्या कडाक्याने रोजा जातोय जड; भक्तीची अग्निपरीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST2021-05-08T04:31:33+5:302021-05-08T04:31:33+5:30
पवित्र रमजान महिन्यात आतापर्यंत १५ उपवास पार पडले असून, यंदा रोजेधारकांचा चांगलाच कस लागला आहे. असे असले तरी रोजा ...

उन्हाच्या कडाक्याने रोजा जातोय जड; भक्तीची अग्निपरीक्षा
पवित्र रमजान महिन्यात आतापर्यंत १५ उपवास पार पडले असून, यंदा रोजेधारकांचा चांगलाच कस लागला आहे. असे असले तरी रोजा ठेवणाऱ्या मुस्लिम भाविकांच्या उत्साहात मात्र कमीपणा झाल्याचे अजिबात दिसत नाही. मुस्लिम बांधवांमध्ये आत्मशुद्धी आणि अल्लाहवरील भक्तीचे प्रतीक म्हणून रमजान महिना पाळला जातो. इस्लाम धर्मामध्ये मोहम्मद पैगंबर यांनी सांगितलेल्या इमान, नमाज, रोजा, जकात, हज या पाच कर्तव्यांपैकी रोजा हे पवित्र कर्तव्य मानले जाते. तसेच हजसाठी ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे, तेच करतात. तराबीच्या नमाजमध्ये पूर्ण कुराणपठण केले जाते आणि हे याच महिन्यात करण्यात येत असते. या पवित्र महिन्यात कुराणपठण, रोजे, तराबीची नमाज याला फार महत्त्व असते.
रमजान महिन्यामध्ये अल्लाहजवळ आपली पवित्र भक्ती व्यक्त केली जाते. तसेच या पवित्र महिन्यात पहाटे ६ नंतर संपूर्ण दिवस अन्नपाण्याविना राहणे, चांगले विचार आणि आचार ठेवणे व कुराणपठण करत राहणे आणि इफ्तारच्या वेळी रोजा सोडणे, असा रमजान महिन्यातील दिनक्रम असतो. संध्याकाळी सूर्यास्तानंतर मशिदीमध्ये उपवास सोडला जातो. तसेच आर्थिक उत्पन्नापेक्षा २.५० टक्के रक्कम रमजान महिन्यात द्यावी लागते, यालाच जकात म्हणतात. मुस्लिम बांधवांसाठी हा महिना वर्षातील पवित्र महिना मानला जातो. या पवित्र महिन्यात हिंदू-बांधवांकडून मुस्लिम बांधवांसाठी पार्टीचे आयोजन करण्यात येत असते. यामुळे या महिन्यात सामाजिक व ऐक्याची भावना निर्माण होत असते. त्यामुळे समाजात भाईचारा वाढत जातो. रमजान महिना म्हणजे उपासना करणे व आभार प्रदर्शनाचा महिना मानला जातो. या शब्दाचा अर्थ असा आहे की, इस्लाम म्हणजे मानवाचे ईश्वराला आत्मसमर्पण. ईश्वराच्या प्रत्येक आज्ञेचे पालन केले जाईल. या महिन्यात दान-धर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच याच महिन्यात तरहवीच्या नमाजला फार महत्त्व असते. तरहवीच्या नमाजमध्ये २० वेळा नमाजपठण करावी लागते. याच महिन्यात पवित्र कुराण उतरविण्यात आली आहे. रमझान महिना हा शांतीचा प्रेमाचा महिना मानला जातो. एक महिनाभर पवित्र अशा रमजान सणामध्ये हिंदू-मुस्लिम एकत्र मोठ्या गुण्यागोविंदाने राहतात. इफ्तार पार्टी करून जगाला एक चांगल्या प्रकारे संदेश देतात.
४२ ते ४४ डिग्री उष्णता व भयंकर तापमान असताना मुस्लिम बांधवांना मात्र कर्तव्य असलेले रोजे ठेवून नमाज, कुराणपठण असे कार्य करावेच लागतात. इफ्तारच्या वेळेपर्यंत रोजेदार पाण्यावाचून व्याकूळ होतो. मात्र, महंमद पैगंबरांनी ईश्वरभक्ती आणि रोजाच्या माध्यमातून अन्न-पाण्याची किंमत आणि संयम काय आहे, ही शिकवण मिळते. -नजमुद्दीन मन्यार, बामखेडा