अतिक्रमणामुळे शहाद्यातील रस्ते अरुंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST2021-09-03T04:31:44+5:302021-09-03T04:31:44+5:30
शहादा नगरपालिका प्रशासनाने गेल्या चार महिन्यांपूर्वी शहरातील मुख्य रस्त्यावरील सुमारे २०० ते ३०० बेकायदेशीर अतिक्रमण हटविले होते. परंतु प्रशासनाच्या ...

अतिक्रमणामुळे शहाद्यातील रस्ते अरुंद
शहादा नगरपालिका प्रशासनाने गेल्या चार महिन्यांपूर्वी शहरातील मुख्य रस्त्यावरील सुमारे २०० ते ३०० बेकायदेशीर अतिक्रमण हटविले होते. परंतु प्रशासनाच्या कारवाईकडे दुर्लक्ष करत काही अतिक्रमणधारकांनी हळूहळू आपले पाय अतिक्रमण वाढविण्यास सुरुवात केली. मुख्य रस्त्यावर पंचायत समितीच्या बाजूला तसेच जुना मामाचे मोहिदा रोड या भागात अतिक्रमण वाढले आहे. महात्मा फुले चौकालगत भाजीपाला व्यवसाय करणाऱ्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. बुधवारी रात्री मोहिदाकडून शहराकडे येणाऱ्या कार (एम.एच. ३९ - जे-७५४९) चालकाला अतिक्रमामुळे अरुंद रस्ता झाल्याने वाहनावरील ताबा सुटला. ही कार विजेच्या खांबाला ठोकली गेली. त्यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. बेकायदेशीर अतिक्रमणामुळे वाहन चालविणे चालकांना कठीण झाले आहे. अशीच स्थिती भारतीय स्टेट बँक ते नगरपालिका, नियोजित ट्रक टर्मिनल या भागापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीर अतिक्रमण वाढू लागले आहे. रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरून चालावे लागते, असे आता नागरिक बोलू लागले आहेत. हे बेकायदेशीर अतिक्रमण पालिका पुन्हा काढेल का? असा प्रश्न उपस्थित होत असून शहरातील महात्मा फुले चौक, पंचायत समितीसमोर तसेच डोंगरगाव रस्त्यावर भविष्यात मोठा अपघात होणार नाही सासाठी पालिकेने अतिक्रमण हटविण्याची मागणी जनतेतून होत आहे.