रस्त्यावरील वाहतूक झाली जीवघेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:42 IST2020-08-20T12:42:50+5:302020-08-20T12:42:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते अक्कलकुवा ते गुजरात हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी ...

रस्त्यावरील वाहतूक झाली जीवघेणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते अक्कलकुवा ते गुजरात हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे निर्माण झाले असून, वाहनधारकांना ते धोकेदायक ठरत आहेत. त्यात पावसामुळे भर होवून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून रस्त्यावर जणू तलावच निर्माण झाला आहे, असे दिसून येत आहे. हे धोकेदायक खड्डे अपघाताला कारणीभूत ठरू पहात आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्वरित दुरूस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावरील तळोदावळण रस्त्यापासून सोमावल फाटा, नळगव्हाण फाटा, शिर्वे फाटा, मोदलपाडा फाटा, वाण्याविहीर फाटा, पिपरीपाडा फाटा, मोलगी नाका, अक्कलकुवा व सोरापाडा दरम्यान असलेल्या या वरखेडी नदीवरील पुल, सोरापाडा रोड, खापर, नवापाडा हद्द या दरम्यानच्या महामार्गावर पावसाळ्यापूर्वीच जागोजागी खड्डे निर्माण होवून वाहनधारकांना त्रासदायक झाले होते. वाहनधारकांना या महामार्गावर तळोदा ते अक्कलकुव्या दरम्यान वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. त्यातच खड्ड्यात पावसाचे पाणी साचून महामार्गावरच जणू तलाव निर्माण झाल्याने या मोठमोठ्या खड्ड्यात चिखलमय पाणी साचून समोरून येणाऱ्या वाहनामुळे अंगावर उडणार नाही याची काळजी घेताना वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहे.
अक्कलकुवा ते सोरापाडा दरम्यान असलेल्या वरखेडी नदीवरदेखील मोठमोठे खड्डे पडले असून पूल अगोदरच कमकुवत झाला आहे. या पुलावर असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून तो धोकेदायक ठरू पाहात आहे. या पुलावरील वाहनांची वर्दळ, त्यात पादचाऱ्यांना मार्गक्रमण करताना मोठे वाहन आले की, जीवमुठीत धरून मार्ग काढावा लागतो. या पुलावरून ये-जा करणाºया पादचाºयांतर्फे पादचारी पुलाची मागणी वेळोवेळी केली जात असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वास्तविक अक्कलकुवा शहरवासीयाचे श्रद्धास्थान असलेली कालिका माता मंदिर, महादेव मंदीर, हनुमान मंदिर हे सोरापाड्यात एकाच ठिकाणी असल्याने सकाळ-संध्याकाळ दर्शनासाठी भाविकांची वर्दळ असते. तसेच शाळा सुरू असताना सावित्रीबाई विद्यालय, रूरल फाऊंडेशनचे विद्यालय, डी.एड. कॉलेज, कला, वाणिज्य व वरिष्ठ महाविद्यालय, मुला-मुलींचे वसतीगृ असल्याने याठिकाणी जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने सोरापाडा नदीवर पादचारी पुलाची मागणी आहे.