रापापूर ते माळखुर्द हा साडेपाच किलोमीटरचा रस्ता ठरतोय जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST2021-06-21T04:20:50+5:302021-06-21T04:20:50+5:30
सातपुड्यातील दुर्गम भागातील अनेक गावांना धड रस्ते नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरदेखील तेथील आदिवासींना सपाटीपर्यंत थेट डोंगर पार करून ...

रापापूर ते माळखुर्द हा साडेपाच किलोमीटरचा रस्ता ठरतोय जीवघेणा
सातपुड्यातील दुर्गम भागातील अनेक गावांना धड रस्ते नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरदेखील तेथील आदिवासींना सपाटीपर्यंत थेट डोंगर पार करून पायपीट करत तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तळोदा येथे यावे लागत असते. साहजिकच प्रशासनाने निदान आमच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. तळोद्याहून माळ खुर्द परिसरातील साधारण १० ते १२ गाव, पाड्यांना जाण्यासाठी माळ खुर्दपर्यंत कच्चा रस्ता संबंधित प्रशासनाने तयार केला होता. रापापूरपासून माळ खुर्दपर्यंत साधारण साडेपाच किलो मीटर अंतराचा हा रस्ता आहे. शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून त्याचे डांबरीकरणाचे कामही नुकतेच पूर्ण केले आहे. साधारण चार कोटी ८० लाख रुपयांचा निधी यावर खर्च करण्यात आला आहे. तथापि केवळ संरक्षक कठड्यांच्या किरकोळ कामाअभावी सदर रस्ता वाहनधारकांसाठी जीवघेणा बनला आहे.
वास्तविक हा रस्ता घाट वळणाचा आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला मोठ-मोठ्या खोल दऱ्या आहेत. अशी वस्तुस्थिती असताना अजूनही संबंधित यंत्रणेने संरक्षक कठड्यांचे काम का हाती घेतले नाही, असा प्रश्न येथील वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. तब्बल १० ते १२ पाड्यांमधील नागरिक दुचाकी, चारचाकीने येथून प्रवास करत असतात. ते जीव मुठीत धरून पुढे मार्गक्रमण करतात. विशेषत: दोन ते तीन ठिकाणचे वळणे अतिशय धोकेदायक आहेत. केव्हा गाडी फेल होऊन खोल दरीत कोसळेल याचा नेम नाही. तरीही संबंधित यंत्रणा दखल घ्यायला तयार नाही. याबाबत रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेषत: हा रस्ता महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अस्तंबा देवस्थानाला जोडतो. साहजिकच येथील वाहतुकीची वर्दळ अधिकच वाढणार आहे. शिवाय तेथून पुढे धडगावकडे जाणाऱ्या रस्त्याचं कामदेखील सुरू आहे. त्यामुळे संरक्षक कठड्यांची कामे हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी आहे.
रस्त्याला लागूनच सिंचन प्रकल्प
या रस्त्याला अगदी लागूनच रापापूर हा तालुक्यातील सर्वात मोठा लघू सिंचन प्रकल्प बांधला जात आहे. रस्त्याचा साधारण १० ते १२ फुटपासून पिचिंगचे काम केले आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याने रस्त्याचाही भराव खचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेथेदेखील संरक्षक कठडे बांधण्याची गरज आहे. मात्र संबंधित अधिकारी त्याकडेही साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. या घाट रस्त्याचा कामाच्या दर्जा बाबतीतही नागरिकांनी शंका उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे. कारण निकृष्ट काम झाल्याचा आरोप केला आहे.
स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतर आमच्या नशिबी पक्का रस्ता आता आला आहे. साहजिकच खूप आनंद झाला आहे. मात्र घाट रस्ता असल्याने या मार्गावर धोकेदायक वळणेदेखील आहेत. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन संरक्षक कठडे बांधण्याची गरज आहे. नेमके त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित विभागाने तातडीने संरक्षक कठडे उभारावेत. - बोखा पाडवी, रहिवाशी, माळ खुर्द, ता.तळोदा