जिल्ह्यात सर्व प्रकारच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST2021-03-17T04:31:09+5:302021-03-17T04:31:09+5:30
जिल्हाधिकारी डाॅ. भारुड यांनी काढलेल्या आदेशानुसार नंदुरबार व शहादा शहर हद्दीतील सर्व शासकीय, निमशासकीय शाळा, निवासी शाळा, कॉलेज, ...

जिल्ह्यात सर्व प्रकारच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर निर्बंध
जिल्हाधिकारी डाॅ. भारुड यांनी काढलेल्या आदेशानुसार नंदुरबार व शहादा शहर हद्दीतील सर्व शासकीय, निमशासकीय शाळा, निवासी शाळा, कॉलेज, वसतिगृहे, कोचिंग क्लासेस व प्रशिक्षण केंद्र ३१ मार्चपर्यंत बंद राहतील. तथापि ऑनलाईन शिक्षणास परवानगी राहील. नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा नगरपालिका क्षेत्रात, अक्राणी नगरपंचायत, अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात सायंकाळी ७ ते सकाळी ६ या कालावधीत कडक संचारबंदी लागू राहील. जीवनावश्यक वस्तू असलेली बाजारपेठ, दुकाने, आस्थापना पूर्वी दिलेल्या आदेशानुसार सकाळी ६ ते सायंकाळी ७ यावेळेत सुरू रहातील. सर्व सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स, हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेसह किंवा स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे सुरू राहतील. शॉपिंग मॉलदेखील कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सुरू राहतील. या सर्व ठिकाणी नागरिकांना चेहऱ्यावर मास्क असल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये. प्रवेशद्वाराजवळ तापमान मोजण्याचे यंत्राचा वापर करावा. संशयित नागरिकांना प्रवेश देण्यात येऊ नये. प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. शारीरिक अंतराचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. विवाह समारंभात सामाजिक अंतराचे पालन करून जास्तीत जास्त ५० व्यक्तींना उपस्थित राहण्यास अनुमती असेल. नियमाचे उल्लंघन झाल्यास मालक व आयोजकांविरुद्ध दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अंत्यविधीस सामाजिक अंतराचे पालन करून जास्तीत जास्त २० व्यक्तीस उपस्थित राहण्यास अनुमती असेल. याबाबत स्थानिक क्षेत्रीय अधिकारी यांनी सुनिश्चिती करावी.
आरोग्य संबधित इतर अत्यावश्यक सेवा पुरविणारी कार्यालये वगळता इतर कार्यालये अथवा आस्थापना ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे. कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा, औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांमध्ये कर्मचारी व ग्राहक यांची गर्दी होणार नाही यास्तव कामांच्या व व्यवसायांच्या वेळांचे नियेाजन करावे. जेवणाचे वेळी योग्य अंतर राहील याची कार्यालय प्रभारींनी दक्षता घ्यावी. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथ प्रतिबंधक कायदा १८९७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, भारतीय दंड संहिता १८६० मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे आदेशात म्हटले आहे.