चार वर्षानंतर फसवणुकीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 21:43 IST2020-03-12T21:43:00+5:302020-03-12T21:43:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सनशाईन हायटेक इन्फ्राकॉन लिमिटेड या दामदुप्पट करून देणाऱ्या कंपनीने नंदुरबार व नवापूर तालुक्यातील गुंतवणूकदारांची ...

चार वर्षानंतर फसवणुकीची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सनशाईन हायटेक इन्फ्राकॉन लिमिटेड या दामदुप्पट करून देणाऱ्या कंपनीने नंदुरबार व नवापूर तालुक्यातील गुंतवणूकदारांची अडीच कोटी रुपयांपेक्षा अधीकची रक्कम लुबाडली आहे. कंपनीचे आॅफीस बंद होऊन तीन ते चार वर्ष होऊनही अद्याप संबधितांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नव्हती, मात्र १६ गुंतवणुकदारांनी तक्रार अर्ज केल्याने आता लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
गुंतवणुकीवर दामदुप्पट रक्कम देण्याच्या नावाखाली सनशाईन हायटेक इन्फ्राकॉन लिमिटेड कंपनीने नागरिकांना अमिष दाखविले होते. कंपनीने २०१२ मध्येये नंदुरबारात जीटीपी कॉलेज रोडला कार्यालय देखील थाटले होते. गावोगावी सभा घेवून कमी कालावधीत दाम दुप्पटीचे अमिष दाखविले होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी कंपनीत एजंटांच्या माध्यमातून पैसे गुंतविले होते. ती रक्कम तब्बल अडीच कोटींपेक्षा अधीक आहे. २०१५ मध्ये कंपनीने नंदुरबार येथील कार्यालय अचानक बंद केले. एकाही ठेवीदाराची रक्कम परत केली नाही. कंपनीला तोटा आल्याने कंपनी बंद पडल्याचे सांगण्यात आले. कंपनीकडील मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत केले जातील असे आश्वासन मॅनेजर वसंत बिºहाडे व जितेंद्र बिºहाडे यांनी दिले होते.
दरम्यान, १० दिवसांपूर्वी अशाच प्रकारच्या गडचिरोली जिल्ह्यातील ठेवीदारांच्या तक्रारींवरून कंपनीचे संचालक रमेशचंद्र गणपतसिंह नायक, रा.झाबुआ व किसनलाल बसराम मेरावत, रा.राजस्थान यांना अटक करण्यात आली. तेथील तपासी अधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार तालुक्यातील ठेवीदारांनी देखील पोलीस अधीक्षकांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.
नंदुरबार व नवापूर तालुक्यातील १६ ठेवीदारांची तब्बल अडीच कोटींपेक्षा अधीकची रक्कमेबाबत तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीचे गांभिर्य लक्षात घेता ठेवीदारांना न्याय मिळावा अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे ठेवीदारांनी केली आहे.
जिल्ह्यात काही वर्षात दामदुप्पटच्या नावाखाली अनेक फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात गुन्हे देखील दाखल झाले आहेत. असे असतांनाही अनेक कंपन्या येतात, अमिष दाखवून लोकांना फसवून निघून जातात. याबाबत दक्षता घेणे आवश्यक असतांना तसे होतांना दिसून येत नाही.