सुसरी वळण बंधाऱ्याच्या पाटचाऱ्यांची दुरुस्ती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST2021-03-22T04:27:17+5:302021-03-22T04:27:17+5:30
निवेदनात म्हटले आहे की, सुसरी वळण बंधारा हा सुसरी नदीवर होळमोहिदा गावाजवळ गोमाई नदीवर बांधलेला आहे. या बंधाऱ्यातील पाणी ...

सुसरी वळण बंधाऱ्याच्या पाटचाऱ्यांची दुरुस्ती करावी
निवेदनात म्हटले आहे की, सुसरी वळण बंधारा हा सुसरी नदीवर होळमोहिदा गावाजवळ गोमाई नदीवर बांधलेला आहे. या बंधाऱ्यातील पाणी पावसाळ्यात खरीप हंगामात सोडले जाते. मुख्य कालव्यातून वितरिकांद्वारे होळ, मोहिदा, उंटावद, तिखोरा, पिंगाणे, कलसाडी, काथर्दा, भादा, धुरखेडा या शिवारातील दोन हजार २२६ हेक्टर क्षेत्र सिंचित करते. या वितरिकांची लांबी सुमारे २० किलोमीटर असून, त्यामुळे परिसरातील बोअरवेलची व विहिरींची पाण्याची पातळी वाढलेली असते. परंतु वळण बंधाऱ्याची सध्याची स्थिती लक्षात घेता त्याची उंची साधारण चार ते पाच फूट वाढविणे आवश्यक आहे. जेणेकरून पाणीसाठा वाढून पूर्ण क्षमतेने सर्व वितरिकांद्वारे मुबलक प्रमाणात लाभार्थ्यांना मिळू शकेल. तसेच मुख्य कालव्याचा पहिल्या व दुसऱ्या किलोमीटर लांबीत बांधकामे तुटल्याने व भराव झाल्यामुळे पाणी पुढे वाहू शकत नाही. तसेच तिसऱ्या व चौथ्या किलोमीटर लांबीत जागोजागी गाळ साचलेला आहे. तसेच पाइप मोऱ्यांची दुरुस्ती व काही काँक्रीटच्या भिंती तुटलेल्या असून, त्याचे बांधकाम करण्याची आवश्यकता आहे. मुख्य बंधाऱ्याची उंची वाढविणे व मुख्य कालव्यापासून चार किलोमीटरपर्यंतच्या वितरिका दुरुस्त करून त्याचे आवश्यक त्याठिकाणी काँक्रीटीकरण केल्यास पाणी पूर्ण क्षमतेने लाभार्थ्यांना मिळू शकेल आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदनावर तालुक्यातील होळ, उंटावद, तिखोरा या गावातील लाभधारक शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेली मागणी योग्य असून, सुसरी वळण बंधाऱ्यातील पाटचाऱ्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. मी पाटबंधारेमंत्री असताना या बंधाऱ्यांची निर्मिती झाली असल्याने या बंधाऱ्याचे महत्त्व मला माहिती आहे. शेतकऱ्यांचे निवेदन प्राप्त झाल्यानंतर लागलीच पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना फोनवरून त्वरित कामाचे अंदाजपत्रक तयार करून निधी मंजुरीसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. पाटबंधारे विभागाने अंदाजपत्रक सादर केल्यानंतर राज्य शासनामार्फत तत्काळ यासाठी निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू.
-एकनाथ खडसे, माजी मंत्री