आॅरेंज झोनमुळे जिल्हावासीयांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 12:56 IST2020-05-03T12:56:38+5:302020-05-03T12:56:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्र शासनाच्या निकषानुसार नंदुरबार जिल्हा आॅरेंज झोनमध्ये आला असल्याने सोमवारपासून जिल्ह्यात काही सेवा सशर्त ...

आॅरेंज झोनमुळे जिल्हावासीयांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : केंद्र शासनाच्या निकषानुसार नंदुरबार जिल्हा आॅरेंज झोनमध्ये आला असल्याने सोमवारपासून जिल्ह्यात काही सेवा सशर्त परवाणगीवर सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे आर्थिक चक्र फिरण्यास मदत होणार असून बेरोजगार हातांनाही काम मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा १८ वर गेला आहे. ज्या भागात नवीन रुग्ण आढळला नाही अशा कन्टेनमेंट झोनबाबत देखील काही निर्णय होण्याची शक्यता आहे.
गेल्या सव्वा महिन्यापासून लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू असले तरी त्याला मर्यादा आहेत. ३ मे रोजी दुसरे लॉकडाऊन संपणार असतांना पुन्हा १७ मे पर्यंत ते वाढविण्यात आले आहे. वाढविलेल्या कालावधीत तीन प्रकारात वर्गीकरण करून त्यादृष्टीने काही सोयी व सवलती देण्याकडे शासनाने कल दाखविला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून हाताला काम मिळेल अशी अपेक्षा आता वाढीस लागली आहे.
रेड ऐवजी आॅरेंज
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता जिल्हा रेडझोनमध्ये जाईल किंवा कसा याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था होती. त्यामुळे जिल्ह्यातील व्यवहारांवर निर्बंध राहतील याबाबत भिती देखील व्यक्त केली जात होती. परंतु केंद्र शासनाने रेड, आॅरेंज व ग्रीन झोन करतांना काही निकष कायम ठेवले. त्यात कोरोनाग्रस्तांची संख्या, जोखीमचे रुग्ण, वाहक रुग्ण, वाढीचा वेग यासह इतर बाबींचा समावेश होता. त्यात नंदुरबार जिल्हा हा आॅरेंज झोनमध्ये गेल्याने सर्वांनाचा हायसे वाटले.
उद्योग-धंद्यांना सूट...
सोमवारपासून उद्योग-धंद्यांना काही प्रमाणात सूट राहणार आहे. ग्रामिण भागातील लहान, मोठे उद्योग सुरू होणार आहेत. यामुळे बेरोजगार हातांना बऱ्यापैकी काम मिळणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू होणार असली तरी त्याला मर्यादा राहणार आहे. दुकाने व आस्थापना उघडण्यास परवाणगी राहणार असली तरी त्याला वेळेची मर्यादा आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा लागणार आहे.
कृषी मालाला प्राधान्य
कृषी आणि कृषी माल यांना प्राधान्य राहणार आहे. महिना, दीड महिन्यांतर खरीप हंगाम सुरू होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर कृषी बियाणे, खते यांच्या खरेदी-विक्रीवर भर राहणार आहे. शिवाय सध्या रब्बी हंगातील गहू, हरभरा व इतर पिकांची काढणी झाली असून बाजारात विक्रीस येत आहे. याशिवाय कापूस खरेदी आणखी दोन ते तीन आठवडे सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बाबीला प्राधान्य राहणार आहे.
मजुरांबाबत दक्षता
परराज्यात अडकलेले मजूर गावोगावी परतू लागले आहेत. त्यामुळे प्रशासनावरील ताण वाढला असून या मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना क्वॉरंगटाईन करण्यात येत आहे. त्यामुळे या मजुरांवरही लक्ष ठेवणे क्रमप्राप्त राहणार आहे.
जिल्हा आॅरेंज झोनमध्ये आला म्हणजे सर्व संकट टळले असे नाही. त्यामुळे धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खरबदारी घेणे आवश्यक आहे. गर्दी होणार नाही, एकमेकांशी जास्त संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. तोंडाला नेहमीच मास्क बांधावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे असे आवाहन देखील प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
४जिल्हाअंतर्गत टॅक्सी व रिक्षा वाहतुकीला सशर्त परवाणगी राहण्याची शक्यता.
४जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणारे, त्यांना कच्चा माल पुरविणाऱ्या आस्थांपनासह आधारीत इतर उद्योग.
४ग्रामिण भागात सर्व प्रकारचे उद्योगधंदे, बांधकाम क्षेत्र, नरेगाची कामे, अन्नप्रक्रिया केंद्र, वीट उत्पादन, मॉल वगळून इतर प्रकारची दुकाने.
४शेती व त्यावर आधारीत व्यवसाय.
४टपाल आणि कुरियर सेवा.
४प्रसारमाध्यमे, आयटी क्षेत्र, डेटा आणि ग्राहक सेवा केंद्र, गोदामे, खाजगी सुरक्षा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा.
४सुरक्षीत आंतर पाळतत वैद्यकी आस्थापने.
४सुट दिलेल्या कामांसाठी व्यक्ती किंवा वाहनांच्या वाहतुकीस परवाणगी, त्यासाठी चार चाकी वाहनात दोन व्यक्तींना तर दुचाकीवर एकास परवाणगी राहणार आहे.
४सलून, स्पा यांनाही सुरू ठेवण्यास सशर्त परवाणगी राहणार आहे.
४आंतरराज्य, केंद्रशासीत प्रदेशातील सर्व माल वाहतूकीला परवाणगी.
४दरम्यान, रेल्वे, बससेवा, शाळा, महाविद्यालये, जीम, सार्वजनिक काम, गर्दी होतील असे कार्यक्रम, धार्मिक स्थळे, मद्य विक्रीची दुकाने, बार बंद राहणार आहेत.
४यासंदर्भात अधिकृत रित्या आदेश काढण्यात येवून त्यासंदर्भातील वेळाही ठरवून दिल्या जाणार आहेत.