कोरोना रुग्णांवर उपचारासाठी नातेवाईकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST2021-04-07T04:31:02+5:302021-04-07T04:31:02+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहादा शहर व तालुक्यात पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर रुप घेतले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्वत्र ...

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी नातेवाईकांचे हाल
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहादा शहर व तालुक्यात पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर रुप घेतले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. शहरातील सर्व कोविड सेंटर फुल्ल झाल्याने रूग्णांना सुरतला पाठविण्यात येत आहे. त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वेळेवर रुग्णवाहिका देखील मिळत नसल्याने खासगी वाहनातून जास्तीचे पैसे देऊन रुग्णांची सोय करावी लागत आहे. शहाद्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा ही तुटवडा असल्याने ऑक्सिजन मिळवण्यासाठी, बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे. कोविड रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन आवश्यक असून ते मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. चांगली आर्थिक परिस्थिती असलेले नातेवाईक पैशांची तमा न बाळगता आपल्या माणसाचा जीव वाचावा म्हणून जास्तीचा खर्च करण्याची तयारी ठेवतात. मात्र सामान्य रुग्णांचे काय, रोजंदारी करणारा माणूस कसा सुरतला जाईल, गेला तरी तेथील हाॅस्पिटलचे दीड-दोन लाख रूपयांचे बिल कसे भरेल, येथेच उपचार करायचे म्हटले तर बेड नाही, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही मग त्याने कसे जगायचे, की जगूच नये, असा संतप्त सवाल सामान्य माणसातून केला जात आहे. याबाबत प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी ही गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. सामाजिक संस्थांनी ही अशावेळी पुढे आले पाहिजे. शेजारील गुजरात राज्यात सरकार आणि सामाजिक संस्थांनी लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. लसीकरणासाठी वार्डा वार्डात लसीकरण केंद्र उघडण्यात आले आहेत. लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना चहा-कॉफी बिस्किटे दिली जातात. आपल्याकडे लसीकरणासाठी तासन्तास थांबूनही साधे पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था होत नाही हे दुर्दैव आहे. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी लसीकरण सेंटरची संख्या वाढविणे आवश्यक आहे. रेमडेसिवीर अभावी कोणाही रुग्णाचा जीव जाऊ नये? यासाठी रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवणे आवश्यक आहे. बेड अभावी रुग्णांवर तालुक्याबाहेर जाण्याची पाळी येऊ नये? यासाठी सर्व कोविड रूग्णालयात बेडची, व्हेंटिलेटरची संख्या वाढविणे ही आवश्यक आहे. अशाप्रसंगी लोकप्रतिनिधींनी देखील या सर्व सोयी पुरवून नागरिकांना आश्वस्त करणे आवश्यक आहे.