श्रमदानातून साकारले ६० वनराई बंधारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:33 IST2019-12-30T12:33:37+5:302019-12-30T12:33:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा व धडगाव तालुक्यातील वनविभागाच्या क्षेत्रात येणाऱ्या नदी-नाल्यांवर वनविभागातर्फे ६० वनराई बंधारे बांधण्यात आले. ...

श्रमदानातून साकारले ६० वनराई बंधारे
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा व धडगाव तालुक्यातील वनविभागाच्या क्षेत्रात येणाऱ्या नदी-नाल्यांवर वनविभागातर्फे ६० वनराई बंधारे बांधण्यात आले. अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने हे बंधारे निर्माण करण्यात आले असून त्यात साठणाºया पाण्याचा वन्यप्राण्यांना फायदा होणार आहे.
पावसाचे पाणी नदी-नाल्यांद्वारे कालांतराने वाहून जाते. परिणामी डिसेंबर महिन्यापासूनच जंगलात वन्यप्राण्यांना पाण्याची कमतरता भासत असल्याने ते पाण्याच्या शोधात नागरी वसाहतीकडे आपला मोर्चा वळवतात. यातून अनेकदा वन्यप्राणी व मानव यांच्यातील संघर्षही होतो. यावर मात करण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांची मदत घेत शहादा व धडगाव तालुक्यात वनविभागाच्या क्षेत्रात सुमारे ६० वनराई बंधारे बांधले आहेत. त्यात हजारो लीटर पाणी अडविण्यात आले असून उन्हाळ्यात या पाण्याचा वापर वन्यप्राण्यांना पिण्यासाठी होणार आहे.
पावसाळा संपल्यानंतर जंगलातील लहान लहान ओढे व नाल्यांचे पाणी झपाट्याने ओसरू लागते. परिणामी उन्हाळ्यात सर्वच ओढे, नाले आटून जातात. ठराविक मोठे तलाव सोडले तर जंगलात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होते. त्यामुळे वन्यपशू पक्षांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. बºयाचवेळेस नाईलाजाने वन्यप्राणी मनुष्य वस्तीकडे वळतात. अशावेळेस मनुष्य-वन्यप्राणी संघर्ष घडतात. यावर उपाय म्हणून नंदुरबार वनविभाग शहादा अंतर्गत शहादा, धडगाव, बिलगाव, काकडदा व तोरणमाळ या वनक्षेत्रात वनराई बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात आली.
जंगलात ठिकठिकाणी लहान लहान ओढे-नाले निवडून त्यातील वाहणाºया पाण्याची धार कमी झाली की वनराई बंधारे बांधण्यात आले. यासाठी सिमेंटच्या रिकाम्या थैल्यांचा उपयोग करण्यात येवून त्यात नाल्यातील रेती भरून थैलीचे तोंड सुतळीने पक्के बांधून नाल्यामधे रचण्यात आली. त्यामुळे नाला-ओढ्यातील वाहणारे पाणी अडते. त्यामुळे डिसेंबरअखेर कोरडे होणाºया नाल्यांमधे उन्हाळ्यातदेखील पाणी टिकून राहते.
चालूवर्षी शहादा व धडगाव तालुक्यात ६० वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व बंधारे श्रमदानातून बांधण्यात आले असून त्यावर एकही पैसा खर्च करण्यात आलेला नाही. यासाठी शहाद्याचे वनक्षेत्रपाल अनिल पवार, सचिन खुणे, रत्नपारखे, पिंगळे, वनक्षेत्रपाल काकरदा व सर्व वनपाल, वनरक्षक, वनमजूर व स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. उपवनसंरक्षक सुरेश केवटे व सहायक वनसंरक्षक राजू झगडे यांनी मार्गदर्शन केले.