महामार्गाच्या दुरूस्तीसाठी रस्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:15 IST2020-03-05T12:14:40+5:302020-03-05T12:15:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अक्कलकुवा येथील वरखेडी नदीच्या पुलावर बुधवारी नेत्रंग ते शेवाळी महामार्गावरील तळोदा ते गव्हाळी दरम्यान ...

महामार्गाच्या दुरूस्तीसाठी रस्तारोको
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : अक्कलकुवा येथील वरखेडी नदीच्या पुलावर बुधवारी नेत्रंग ते शेवाळी महामार्गावरील तळोदा ते गव्हाळी दरम्यान असलेल्या जीवघेण्या रस्त्याच्या कामासाठी भारतीय जनता पक्षातर्फे भाजपाचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. या वेळी तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उद्यापासून काम सुरू होणार आहे.
नेत्रंग ते शेवाळी महामार्गावरील तळोदा ते गव्हाळी दरम्यान असलेला महामार्ग हा अतिशय जीवघेणा झाला असून, मंगळवारी नयनशेवडी गावाजवळ अपघातात दोन जण जागीच ठार झाले होते. बुधवारी भारतीय जनता पक्षातर्फे भाजपाचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा येथील वरखेडी नदीच्या पुलावर दुपारी ११ वाजता रास्तारोको आंदोलन सुरू करण्यात आले. या वेळी महामार्गाचे सहाय्यक अभियंता अक्षय कांकरीया यांनी उद्यापासूनच रस्त्याच्या स्कॅनिंगचे काम सुरू करून लगेचच कामाला सुरुवात होणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी प्रभारी तहसीलदार विजय कछवे, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार राजेश अमृतकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.डी. पाटील, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, रूपाली महाजन हे अधिकारी उपस्थित होते.
तळोदा नाका ते गव्हाळी दरम्यान असलेल्या ३५ किलो मीटरच्या महामार्गासाठी २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे सहाय्यक अभियंता अक्षय कांकरीया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी भाजपचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास मराठे, दिनेश खरात, नीलेश जैन, मनोज सोनार, सुधीर पाडवी, बापू महिरे, जीवन शिंदे, मुन्ना क्षत्रिय, प्रदिप पाडवी, वसंत पाडवी, भुपेंद्र पाडवी, यशवंत नाईक, रमेश नाईक आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
नेत्रंग ते शेवाळी महामार्गाची पावसाळ्यात अत्यंत दुरवस्था झाली असताना या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी यांनी वेळोवेळी लेखी निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या वेळी संबंधितांनी महामार्गाचे काम त्वरित सुरू करण्याचे आश्वासन वेळोवेळी देऊन वेळ निभावून नेत होते. मात्र बुधवारी आंदोलनाचा पवित्रा उचलून सुमारे तासभर वरखेडी नदी पुलावर रस्ता रोको केल्याने संबंधित अभियंता अक्षय कांकरिया यांनी उद्यापासून महामार्गाचे काम सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. परंतु त्यांच्या आश्वासनावर विश्वास नसल्याने तहसीलदार विजय कचवे यांना बोलावून त्यांच्यासमोर स्वत: तहसीलदार जबाबदारी घेत असतील तर हे आंदोलन मागे घेऊ असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. तहसीलदार कचवे यांनी त्वरित मागणी मान्य करीत संबंधितांकडून मी आश्वासन देतो असे सांगितल्याने आंदोलन मागे घेतले.
शेवाळे नेत्रग महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाल्याने दुचाकी-चारचाकी वाहनधारक या रस्त्याला अगदीच कंटाळले होते या महामार्गावर दररोज लहान-मोठे अपघात घडत होते. तसेच मोठ्या अपघातांमध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. या महामार्गाचे काम या आंदोलनामुळे त्वरित सुरू होणार असल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या महामार्गाचे काम सुरू होणार असल्याचे या महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रक चालकाला कळल्याने ट्रकचालकाने आंदोलनकर्त्यांचे आभार मानले.