दोन हजार आशांकडून रॅपिड सर्र्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 12:38 PM2020-04-08T12:38:43+5:302020-04-08T12:39:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा आरोग्य विभागाने ग्रामीण तसेच शहरी भागात आशा सेविकांना तातडीच्या रॅपिड सर्वेसाठी नियुक्त केले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा आरोग्य विभागाने ग्रामीण तसेच शहरी भागात आशा सेविकांना तातडीच्या रॅपिड सर्वेसाठी नियुक्त केले असून त्यांच्याकडून घरोघरी किरकोळ आजारपण आणि इतर बांबींचा आढावा घेणे सुरु झाले आहे़ सोमवारपासून गती आलेला हा सर्व्हे दोन दिवसात संपून बाहेरगावाहून आलेल्यांची माहिती समोर येणार आहे़
जिल्हा आरोग्य विभागाने बाहेरगावाहून आलेल्या स्थलांतरीत नागरिकांमुळे कोरोनाची बाधा होण्याची भिती वर्तवली होती़ यातून ग्रामीण आणि शहरी भागात जलद सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांऐवजी आशांना नियुक्त करण्याचा निर्णय घेत सोमवारपासून कामकाज सुरु झाले आहे़ यांतर्गत जिल्हाभरात तब्बल १ हजार ८७२ आशा कामाला लागल्या आहेत़ प्रत्येक आशाने किमान १ हजार घरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आहेत़ या सर्वेक्षणात कोरोनाचा देशात प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर बाहेरगावाहून आलेल्यांची माहिती संकलित करुन घरात कोणाला किरकोळ सर्दी, खोकला, ताप आदी आजारांची लक्षणे असल्यास त्यांची माहिती तातडीने जिल्हा आरोग्य विभागाकडे द्यायची आहे़ तालुका आरोग्य अधिकारी या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत़ दरदिवशी त्यांच्याकडून गटप्रवर्तक आणि आशा यांचा आढावा घेण्यात येत आहे़ एखाद्या घरातून कोरोना सारखी लक्षणे असलेला रुग्ण आढळून आल्यास त्याला तातडीने जिल्हा रुग्णालय तसेच इतर क्वारंटाईन कक्षात दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ यानुसार शुक्रवारपर्यंत कामकाज सुरु राहणार आहे़ यामुळे येत्या काळात विलगीकरण कक्षांमध्ये सर्दी खोकल्यासारखे आजार असलेल्या काहींना भर्ती करण्याची शक्यता असल्याने सातही क्वारंटाईन कक्ष सज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एऩडी़बोडके यांनी दिली आहे़