अवकाळी पावसाने उडवली दानादान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 12:45 IST2020-03-07T12:45:32+5:302020-03-07T12:45:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबारसह नवापूर व परिसरात शुक्रवारी सकाळी मध्यम ते तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे ...

अवकाळी पावसाने उडवली दानादान
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबारसह नवापूर व परिसरात शुक्रवारी सकाळी मध्यम ते तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकाला काहीसा फटका बसला. तर नंदुरबार बाजार समितीतील धान्य आणि मिरचीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान, दिवसभर वातावरणात ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. त्यामुळे कमाल तापमान देखील ३२ ते ३३ अंशापर्यंत राहिले.
जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणातील बदल दिसून येत आहे. कधी ढगाळ वातावरण राहत आहे तर कधी सोसाट्याचा वारा वाहत आहे.
तुरळक ते मध्यम...
शुक्रवारी सकाळी ७ ते ७.३० वाजेदरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली. काही भागात १० ते १५ मिनिटे तर काही भागात तीन ते चार मिनिटे पाऊस सुरू होता. मध्यम ते हलक्या स्वरूपाचा झालेला पावसाने अनेकांची धांदल उडविली. सकाळी हलक्या वातावरणात झालेल्या पावसामुळे वातावरणात अधीकच गारवा निर्माण झाला होता.
धान्य व मिरचीचे नुकसान
नंदुरबार बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खरेदी करून ठेवलेला व शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या धान्याचे पावसामुळे मोठे नुकसान झाले. पावसाची कुठलीही शक्यता नसल्यामुळे व्यापाºयांनी नेहमीप्रमाणे उघड्यावर धान्य ठेवले होते. अचानक आलेल्या पावसामुळे धान्य उचलण्यास वेळ न मिळाल्याने धान्याचे नुकसान झाले. त्यात मका, हरभरा, सोयाबीन यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय शहरातील वळण रस्ता आणि दोंडाईचा रस्त्यावर असलेल्या मिरची पथारींवरील मिरचीलाही या पावसाचा मोठा फटका बसला. पावसात मिरची भिजल्याने मिरची काळी पडण्याची शक्यता आहे. शिवाय मिरची सडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे मिरची व्यापाºयांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे.
शेतातील पिकांचे नुकसान
शेतात काढणीवर आलेले हरभरा आणि गहू पिकाचेही या पावसामुळे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले आहे. काढून ठेवलेला हरभरा पावसात भिजला आहे. शेतीमाल सुरक्षीतस्थळी हलविण्यासाठी देखील वेळ मिळाला नाही.
पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी घसरले आहे. मंगळवार, ३ मार्च रोजी ३६ अंशावर गेलेले तापमान शुक्रवारी ३१ ते ३२ अंशावर घसरले होते.
किमान तापमान देखील १८ ते २१ अंशापर्यंत होते. होळीपर्यंत वातावरणातील हे बदल कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.